मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार
मुंबई : राज्यात काही भागांत निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. "सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असल्याने डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल, विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालावे. कोणत्याही स्तरावर इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही, यावर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवावे," असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, 'एल निनो'च्या संकटामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारचा 'ॲक्शन प्लॅन' पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीत तीन नावांवर खल; सुनेत्रा पवार करणार अंतिम शिक्कामोर्तब मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी ...
जिओ वर्ल्ड सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यातील इंधनाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "काही विशिष्ट भागांत इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी ही समस्या सर्वदूर नाही. एखादी स्थानिक घटना घडल्यास तिचा मोठा गाजावाजा होतो, मात्र जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या डिझेलचा मोठा वापर शेतीकामांसाठी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि गरजेनुसार डिझेल उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."मुख्यमंत्री म्हणाले, "एल निनोमुळे यंदा वेगवेगळ्या टप्प्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत पावसाचा तीव्र तुटवडा जाणवू शकतो. या नैसर्गिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आधीच एक व्यापक आराखडा तयार केला असून, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे."
राज्यसभेबाबत राष्ट्रवादीच्या निर्णयाला समर्थन
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, "या जागेवर उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याला महायुतीचे पूर्ण समर्थन असेल. महायुतीकडे सत्ताधारी पक्ष म्हणून विधानसभेत २३२ मते आहेत. त्यामुळे या जागेवर विरोधी पक्षाकडून कोणी निवडणूक लढवेल असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीने एकदा आपला उमेदवार निश्चित केला की, पुढची औपचारिकता तातडीने पूर्ण केली जाईल."