Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या हलगर्जीपणा आणि वेळेत प्रतिबंधक कारवाई न केल्याने खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


माहितीनुसार निलंबितांमध्ये पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय ?


या प्रकरणाची सुरुवात झाली १ मे रोजी. बोदवड पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तक्रारीमध्ये गंभीर वाद निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. पुढे काही चुकीचे कृत्य गडू नये आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनही कोणतीही चौकशी किंवा कारवाईची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिक वाढत गेला आणि अखेर खुनासारखी गंभीर घटना घडली.


दरम्यान, सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ हे बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत होते. १९ मे रोजी ते दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकॉ मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले होते. संबंधित दोन्ही गटांतील वाढत्या वैमनस्याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी केवळ दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यामध्ये आणून कोणतीही कायदेशीर अथवा प्रतिबंधक कारवाई न करता सोडून दिले. या निष्काळजीपणामुळे २१ मे रोजी गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



या संपूर्ण प्रकरणात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरातील वादाची सविस्तर माहिती पोकॉ मोहन चौधरी यांनी त्यांना फोन तसेच व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. स्थानिक नगरसेवकाने देखील परिसरातील संवेदनशील परिस्थितीबाबत त्यांना सतर्क केले होते. मात्र, इतकी गंभीर माहिती मिळूनही त्यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या नाहीत.


तसेच वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नाही. परिणामी, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.

Maharashtra Weather Update : कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात

BMC Makes 4-Way Waste Segregation : मुंबईत कचराकोंडीवर बीएमसीचा 'मास्टरस्ट्रोक': मोठ्या सोसायट्या, हॉटेल्ससाठी '४-स्तरीय' कचरा वर्गीकरण सक्तीचे!

मुंबई : मुंबई शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या अक्राळविक्राळ समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा