मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; घबराट पसरवून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आणू नये
मुंबई : "विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही मित्रपक्ष एकत्रित बसून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतील. आम्ही सध्या वेगवेगळ्या निकषांवर चर्चा करत असून, या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे पूर्ण ताकदीने उतरतील," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विधान परिषद रणनीतीसह राज्यातील इंधन पुरवठा, मंत्रिमंडळ निर्णयांची अंमलबजावणी आणि औद्योगिक करारांवर सविस्तर भाष्य केले.
राज्यात काही भागांत सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून विनाकारण घबराट (पॅनिक) निर्माण केली जात आहे. कोणत्याही पेट्रोल पंपाची किंवा भागाची एक निश्चित पुरवठा साखळी ठरलेली असते. परंतु, जेव्हा अफवांमुळे लोक अचानक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त इंधन भरू लागतात, तेव्हा त्या साखळीवर ताण येतो. याचा अर्थ साठा कमी आहे असा अजिबात होत नाही. जागतिक परिस्थिती कठीण असतानाही भारताने आपली पुरवठा साखळी मजबूत ठेवली असून, नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधनाचा वापर करावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी पोलिसांच्या वाहनांना डिझेल मिळत नसल्याच्या केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. "राज्यात कुठेही पोलिसांच्या वाहनांसाठी इंधनाची कमतरता नाही. नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्ध असतानाही एका पोलीस कर्मचाऱ्याने बेजबाबदारपणे नकारात्मक उत्तर दिल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात आली आहे," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अमरावती : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता थेट विदर्भापर्यंत जाऊन पोहोचला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच ...
राहुल गांधी रिजेक्टेड मटेरियल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या भूमिकेचे स्वागत केले. "शरद पवारांनी या संदर्भात जे सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यांमुळे भारताने विविध देशांसोबत अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक करार केले असून, यामुळे पुढच्या १५ ते २० वर्षांचे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पवारांनी या दौऱ्यांवर विनाकारण टीका न करण्याचा सल्ला विरोधकांना दिला आहे. पंतप्रधान देशाच्या हिताचे काम करत असताना त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करताना, "मागच्या वेळी मी राहुल गांधींविषयी बोललो तेव्हा शरद पवारांना राग आला होता, पण मी पुन्हा सांगतो की तो 'रिजेक्टेड माल' आहे," असा टोला त्यांनी लगावला.
मंत्रिमंडळाचे ९२ टक्के निर्णय पूर्ण!
राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "नुकतीच मंत्रालयात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची आढावा बैठक पार पडली. यामध्ये सर्वच विभागांनी सादरीकरण केले. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी तब्बल ९२ टक्के निर्णय पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित ८ टक्के निर्णयांपैकी काही प्रस्ताव राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, तर काही तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे. एकूणच राज्याची प्रगती समाधानकारक आहे."