Monsoon Update : केरळमध्ये ५ दिवस आधीच मान्सूनची एन्ट्री; मुंबई-कोकणात मे महिन्याच्या अखेर पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून, यंदा केरळमध्ये मान्सून सरासरी तारखेपेक्षा पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनला मानले जाते. मात्र यंदा २६ मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत नैऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, अंदमान समुद्रात तसेच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळत असून, अंदमान-निकोबार बेटांवरही यंदा मान्सून साधारण सहा दिवस आधी दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.


केरळमध्ये मान्सून आगमनाची संभाव्य तारीख २६ मे असली तरी त्यामध्ये अधिक-उणे चार दिवसांचा फरक पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर समुद्रातून मिळणाऱ्या आर्द्रतेच्या पुरवठ्यावर त्याचा पुढील प्रवास अवलंबून असतो. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होईल, याबाबतचा स्पष्ट अंदाज केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच व्यक्त केला जाणार आहे.


दरम्यान, ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरणनिर्मिती सुरू होईल. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.



यंदा एल निनोचा प्रभाव जुलै महिन्यापासून जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे साठवण आणि जलसंधारण यावर भर देणे आवश्यक असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. पावसाचे प्रमाण आणि वितरण यावर एल निनोचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुढील काळात हवामानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.


मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवताना हवामान विभाग विविध हवामान घटकांचा अभ्यास करतो. यामध्ये वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील मान्सूनपूर्व सरी, चीन समुद्रावरील विकिरण, आग्नेय हिंदी महासागरातील वारे, नैऋत्य प्रशांत महासागरातील विकिरण तसेच ईशान्य हिंदी महासागरातील वाऱ्यांचा समावेश असतो. या सर्व घटकांच्या आधारे केरळमधील मान्सून आगमनाची तारीख निश्चित केली जाते.


विशेष म्हणजे, भारतीय हवामान विभागाने २००५ ते २०२५ या २१ वर्षांच्या कालावधीत केरळमधील मान्सून आगमनाबाबत केलेले अंदाज बहुतांश वेळा अचूक ठरले आहेत. केवळ २०१५ सालचा अंदाज वगळता उर्वरित सर्व वर्षांमध्ये हवामान विभागाचा अंदाज वास्तवाशी जवळपास जुळला होता. गेल्या वर्षीही केरळमध्ये मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता.

Comments
Add Comment

Mumbai Janganana : मुंबईकर गावाला, घराला टाळी आणि बंद घराची पाहणी करायला येणार जनगणनेचे कर्मचारी?

घरयादी व घरगणना मोहिमेला शनिवार पासून प्रारंभ, सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन मुंबई

Old Birth and Death records : जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी यांसारखे जुने अभिलेख अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होणार

महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचा पुढाकार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्‍या ई प्रशासकीय

BMC Electric Vehicles (EV) : मुंबई महापालिकेच्या ताफ्यात केवळ ४२ इलेक्ट्रिक वाहने

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर इंधन बचतीकरता अनेकांनी वाहनांचा ताफा कमी करून तसचे

Gig Workers Strike : इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी संप; स्विगी, ओला-उबर, झेप्टोसह अनेक ॲप-आधारित सेवा आज ठप्प!

मुंबई : देशभरातील गिग वर्कर्सनी आज, १६ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्याचा परिणाम अनेक लोकप्रिय

Mumbai-Hyderabad Bullet Train : बुलेट ट्रेनमुळे बदलणार महाराष्ट्राचा वेग; पंढरपूर-सोलापूरला होणार मोठा फायदा!

मुंबई : मुंबई ते हैदराबाद दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

BMC चे पाणीकपातीनंतर बुस्टर पंपांवर कारवाईचे निर्देश

घोषणा झाल्यापासून झोपलेले महापालिका अतिरिक्त आयुक्त आता झाले जागे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळापूर्व