मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळत आहे. एकीकडे काही भागांत पावसाची हजेरी असतानाच, दुसरीकडे मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रात कडाक्याचे ऊन पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्याची तीव्रता सर्वाधिक असल्याने, अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे कडक आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, आरोग्याची विशेष काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.
जळगाव ४४.५ अंशांवर
पुणे : पुण्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड (Abhay Chhajed) यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून ...
राज्यातील तापमानाचे आकडे धडकी भरवणारे आहेत. सोमवारी जळगाव जिल्ह्याने उष्णतेचा उच्चांक गाठला असून तिथे तब्बल ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. विचित्र बाब म्हणजे, कडाक्याच्या उन्हा सोबतच काही जिल्ह्यांत पावसानेही हजेरी लावली आहे, ज्यामुळे हवेत आर्द्रता वाढून अंगाची लाहीलाही होत आहे. आज प्रामुख्याने जळगाव, नंदूरबार, नाशिक, धुळे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम असून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
वाघूर धरणातील पाणीसाठा घटला
वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आता पाणीसाठ्यावर होऊ लागला आहे. जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणातील पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे. केवळ अडीच महिन्यांच्या कालावधीत धरणातील साठ्यात १५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. उन्हाळ्यापूर्वी जो साठा ८६% होता, तो आता ७१ टक्क्यांवर आला आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढला असल्याने, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकण किनारपट्टीवर दमट हवामान
राजधानी मुंबईसह ठाणे आणि कोकण पट्ट्यातही उन्हाचा त्रास वाढला आहे. मुंबईत तापमान ३५ अंश असले तरी समुद्राजवळील दमट हवेमुळे (Humidity) प्रत्यक्षात जास्त उकाडा जाणवत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारा संभाव्य 'हिटस्ट्रोक' (उष्णघात) रोखण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी उष्णघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. जास्तीत जास्त पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत असले तरी, सध्या सुरू असलेल्या उन्हाचा चटका सुसह्य होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.





