Friday, May 8, 2026

Suvendu Adhikari's Oath : शुभेंदू अधिकारी आज घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

Suvendu Adhikari's Oath : शुभेंदू अधिकारी आज घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची एकमताने निवड झाल्यानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शुक्रवारी या महत्त्वपूर्ण निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून, बंगालच्या इतिहासात भाजपचा पहिला मुख्यमंत्री विराजमान होण्याचा ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळणार आहे.

राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधी

विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच, शुभेंदू अधिकारी यांनी थेट राजभवन गाठले. तिथे त्यांनी राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा अधिकृत दावा पेश केला. यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले असून, आज कोलकाता येथील ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) सत्ता असलेल्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला एक मोठे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

अमित शाह यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव आणि एकमताने निवड

एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षाचे प्रमुख संघटक म्हणून ओळखले जाणारे ५५ वर्षीय शुभेंदू अधिकारी आता राज्याचे नेतृत्व करणार आहेत. अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी एकूण आठ प्रस्ताव आले होते आणि या सर्व प्रस्तावांमध्ये केवळ शुभेंदू अधिकारी यांचेच नाव सुचवण्यात आले होते. "मी शुभेंदूजींना खूप वर्षांपासून ओळखतो. ते एक खंदे लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रशासनाची उत्तम जाण असून त्यांनी पावलोपावली तृणमूल काँग्रेसला कडवी झुंज दिली आहे," अशा शब्दांत शाह यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बंगालला एक स्थिर सरकार मिळेल आणि ते जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"भीती गेली, विश्वासाचे पर्व सुरू"

भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना शुभेंदू अधिकारी यांनी एक अत्यंत सूचक आणि आश्वासक विधान केले. "आता भीती संपली असून, विश्वास आला आहे," असे ते म्हणाले. बंगालच्या जनतेने भाजपला जो ऐतिहासिक कौल दिला आहे, त्याचा आदर करत पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

५५ वर्षांनंतरचा ऐतिहासिक बदल

शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, तब्बल ५५ वर्षांनंतर राज्याला असा मुख्यमंत्री मिळाला आहे ज्याची राजकीय मुळे कोलकात्यात नसून ग्रामीण भागात आणि तळागाळात रुजलेली आहेत. यापूर्वी १९७१ मध्ये ग्रामीण भागातील नेते अजय मुखर्जी हे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (रिक्विझिशनिस्ट) गटाचे प्रतिनिधित्व करत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर आता अधिकारी यांच्या रूपाने हा इतिहास पुन्हा रचला जात आहे.

विद्यार्थी चळवळ ते मुख्यमंत्रीपदाचा प्रवास

माजी केंद्रीय मंत्री सिसिर अधिकारी यांचे सुपुत्र असलेल्या शुभेंदू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीतून केली होती. त्यावेळी बंगालमध्ये डाव्या पक्षांचे मोठे वर्चस्व होते. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते ममता बॅनर्जी यांचे सर्वात विश्वासू आणि ताकदवान नेते बनले. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी भाजपची वाट धरली आणि आज तेच ममता बॅनर्जी यांचे सर्वात मोठे आणि कडवे राजकीय विरोधक ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीतील भाजपचे घवघवीत यश

नुकत्याच पार पडलेल्या २९४ सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ ८० जागांवरच समाधान मानावे लागले आहे. या स्पष्ट बहुमतामुळे भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग विनाअडथळा मोकळा झाला. या नवीन राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्यपाल आर. एन. रवी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालची जुनी विधानसभा अधिकृतपणे विसर्जित केली. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर ही विधानसभा अस्तित्वात आली होती, जिचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे.

ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप आणि राजीनाम्यास नकार

एकीकडे सत्तापालट होत असताना, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र मतमोजणी प्रक्रियेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. "जनतेचा कौल लुटला गेला आहे," असा गंभीर आरोप करत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, "आपला पराभव जनतेने केलेला नाही, तर एका मोठ्या कटाचा तो भाग आहे. त्यामुळे माझा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी हरले नाही आणि मी लोकभवनात (सचिवालय) जाणार नाही. त्यांना जे काही करायचे आहे ते घटनात्मक नियमांनुसार करू देत," अशी आक्रमक आणि बंडखोर भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >