मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (Special Investigation Team or SIT) स्थापन करण्यात आले आहे. विशेष तपास पथकात अर्थात एसआयटीत पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभागाचे पोलीस उप आयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण - मध्य, गुन्हे शाखा) हे पाच अधिकारी आणि त्यांच्या मदतीला इतर पोलीस अधिकारी - कर्मचारी असतील. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे एसआयटी तपास करणार आहे.
याआधी भारतीय जनता पार्टीने मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी तपास करण्याची मागणी केली होती. परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यास मदत व्हावी तसेच देशाची सुरक्षा अबाधित राखणे शक्य व्हावे यासाठी तपासाची मागणी करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक नील सोमय्या यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मुंबई महापालिकेत ही मागणी केली होती.
हजारोंच्या संख्येने बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुंबईत वास्तव्यास आहेत, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. या संशयाची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्त रितू तावडे यांनी पोलीस तपासाचे निर्देश दिले. यानंतर हाती आलेल्या प्राथमिक माहितीचा आढावा घेऊन तसेच खबऱ्यांकडून प्रकरणाची व्याप्ती समजून घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सखोल तपासाकरिता एसआयटीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.






