Wednesday, May 6, 2026

नाशिक रिंगरोड प्रकरण : शेतकऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल, चौकशी होणार; गिरीश महाजनांनी दिले आश्वासन

नाशिक रिंगरोड प्रकरण : शेतकऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल, चौकशी होणार; गिरीश महाजनांनी दिले आश्वासन

नाशिक : नाशिकमधील रिंगरोड प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. नाशिक कुंभमेळा पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादन अखेरच्या टप्प्यात आले असताना शनिवार (दि.२) मातोरी व मुंगसरा येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भूसंपादन अधिकारी व पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, असे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले.

नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना घरात शिरून मारहाण केली, एका प्रशासकीय अधिकाऱ्याने महिलांशी गैरकृत्य केल्याचे आरोप होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मातोरी, मुंगसरे गावातील गावठाण भागातून मार्ग गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. त्या अनुषंगाने बदलाबाबत विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सक्तीच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक, बाधित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात चर्चा केली.

रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे लवकरच दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन या गावांना भेट देतील. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढतील. या गावांमध्ये मोजणीवेळी अनुचित प्रकार घडला असेल, तर त्याची चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. उच्च न्यायालयात प्रकरण असले तरी कार्यवाहीस स्थगिती नसल्याने दोन्ही गावातील मोजणी करण्यात आली. १९ क्रमांकाची नोटीस बजावल्यानंतर शेतकरी हरकती घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >