SIT नेमणूक; दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, तपासावर उच्चस्तरीय देखरेख, पॅरोलवर सुटकेला सरकारचा विरोध
नसरापूर प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३–४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मानवतावादी दृष्टिकोनातून फाशीची शिक्षा सुनावेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
पुणे : भीती दाखवत एखाद्याकडून खंडणी वसुली केली जाते आणि पोलीस आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकतात, पण जर पोलीसच खंडणी वसुली करणारे निघाले तर? पुण्यातुन असाच ...
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३–४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असूनही तो मोकाट फिरत होता, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तात्काळ एसआयटीची नेमणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास उच्च पातळीवरून सुरू असून, स्वतः एसपी आणि डीजी स्तरावरील अधिकारी केस मॉनिटर करत आहेत. मुख्यमंत्रीही या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
या प्रकरणात कोणतीही दिरंगाई होऊ दिली जाणार नसून प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ केस उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन आठवड्यांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोपीला कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. न्यायालयालाही या प्रकरणात गांभीर्याने विचार करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे : पुणे शहरात जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि अधिकारपत्राचा गैरवापर केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. लोहगाव आणि वडगाव शेरी येथील जमिनींशी ...
दरम्यान, वारंवार बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींना पॅरोलवर सोडण्याबाबतही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सुटका मिळू नये, यासाठी उच्च न्यायालयात विनंती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कारण अशा आरोपींना सवलत मिळाल्यानंतर ते पुन्हा अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे करत असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे.