पश्चिम बंगाल (West Bangal Election 2026) विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाने २९४ पैकी २०६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. या संपूर्ण निवडणुकीत एका नावाचा दबदबा सर्वाधिक पाहायला मिळत आहे, त्या म्हणजे कलिता माझी. (Kalita Majhi) औसग्राम मतदारसंघातून त्यांनी मिळवलेला विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून, एका कष्टकरी महिलेने प्रस्थापित राजकारण्यांना दिलेली मोठी चपराक मानली जात आहे.
बदलापूरला १३ ते ८ मे दरम्यान होणार स्पर्धा मुंबई : बदलापूर येथे १३ ते १७ मे याकाळात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असून ...
दैनंदिन संघर्ष आणि विजयाची आकडेवारी
कलिता माझी यांचा विजय हा लोकशाहीच्या ताकदीचे उत्तम उदाहरण आहे. औसग्राम (अनुसूचित जाती) मतदारसंघ क्रमांक २७३ मधून त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार श्यामा प्रसन्न लोहार यांचा १२,५३५ मतांनी पराभव केला. कलिता यांना एकूण १,०७,६९२ मते मिळाली, तर लोहार यांना ९५,१५७ मतांवर थांबावे लागले. या लढतीत सीपीआय (एम) आणि काँग्रेसचे उमेदवार खूप मागे पडले. लोकांच्या घरांत धुणी-भांडी करणाऱ्या कलिता यांनी घरोघरी जाऊन केलेल्या प्रचाराला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
२,५०० रुपयांची नोकरी अन् विधानसभेची वारी
राजकारणात येण्यापूर्वी कलिता माझी यांचे आयुष्य अत्यंत साधे आणि कष्टाचे होते. त्या गुस्करा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या तीन-चार घरांमध्ये घरकाम करत असत, ज्यातून त्यांना महिन्याला जेमतेम २,५०० ते ४,००० रुपये मिळत. अशा बेताच्या परिस्थितीतून बाहेर पडून त्यांनी विधानसभेपर्यंत मजल मारली आहे. भाजप खासदार पी. सी. मोहन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या संघर्षाचे कौतुक करताना म्हटले की, "एका सामान्य नागरिकाला संधी देणे हीच लोकशाहीची खरी ओळख आहे."
पराभवाने न खचता मिळवलेले यश
कलिता माझी यांचा हा विजय सहज मिळालेला नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यावेळी तृणमूलच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत किंवा त्यांनी आपले सामाजिक काम थांबवले नाही. पक्षाने २०२६ मध्ये पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या घरकामातून एक महिन्याची रजा घेतली आणि पूर्ण ताकदीने प्रचारात उतरल्या. त्यांच्या जिद्दीमुळेच आज त्या विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून पोहोचल्या आहेत.
आमदार म्हणून प्राधान्यक्रम: शिक्षण आणि शेती
निवडून आल्यानंतर कलिता माझी यांनी आपले ध्येय स्पष्ट केले आहे. सरकारी शाळांची खालावलेली स्थिती आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करणे हे त्यांचे पहिले कर्तव्य असेल असे त्यांनी सांगितले. यासोबतच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावरही त्या भर देणार आहेत. स्वतः अत्यंत गरिबीतून आल्यामुळे सामान्य जनतेच्या वेदना त्या चांगल्या प्रकारे जाणतात. पती सुब्रत माझी आणि मुलासह राहणाऱ्या कलिता यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.