नाशिक : कामटवाडे परिसरात लग्नसमारंभादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाहतुकीत कोंडी केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गजलक्ष्मी रो हाऊस, वृंदावननगर, कामटवाडे येथे लग्नसमारंभ सुरू असताना सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.(Nashik Crime News)
या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीनकुमार पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लग्नसमारंभाचे आयोजक दादाजी नामदेव भामरे (वय ६८, रा. वृंदावननगर, कामटवाडे) तसेच नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष सगंम अधिक तपास करीत आहेत.(Nashik Crime News)
तर दुसरीकडे मित्राची माहिती विचारण्याच्या कारणातून तरुणाचे अपहरण करीत फायटरने मारहाण केल्याची घटना अंबड (Ambad) परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुमेर हुसेन शेख (वय २२, रा. स्कायलार्क अपार्टमेंट, मदीना नगर, वडाळागाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फिरदोस कॉलनी, अंबड येथे नमाज पठणासाठी गेले होते. नमाजानंतर सोहेल नावाच्या युवकाने त्यांना थांबवून हाशिम खान याच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. त्यानंतर हाशिमने फिर्यादीला फोन करून भेटण्यास बोलावले. सुरुवातीला फिर्यादीने नकार दिला असता “मला फक्त बोलायचे आहे,” असे सांगून अंबड लिंक रोडलगतच्या मदरशाजवळ बोलावण्यात आले.(Nashik Crime News)
फिर्यादी व त्यांचा मित्र अमजद शहा तेथे गेल्यानंतर दोन-तीन युवकांनी फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने काळ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना खाडी परिसरातील एका मोकळ्या जागी नेण्यात आले. तेथे हाशिम, कैफ, फरहान व अन्य साथीदार उपस्थित होते. त्यांनी “गयास कुठे आहे?” अशी विचारणा करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. फिर्यादीने माहिती नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.





