Devendra Fadnavis On missing link : "तुमच्या सरकारने थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं..."; फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला, मिसिंग लिंकचं दिमाखात लोकार्पण!

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज थाटात लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी हा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचे नमूद केले. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे एक मोठे स्वप्न आज पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यापुढे या प्रकल्पाला 'मिसिंग लिंक' ऐवजी 'कनेक्टिंग लिंक' असे नाव द्या, कारण यात काहीही 'मिसिंग' नाही, अशी सूचक सूचना त्यांनी गायकवाड नावाच्या अधिकाऱ्याला केली. या प्रकल्पाचे अधिकृत नाव लवकरच ठरवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, या मार्गावरील सुरु असलेल्या कामांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना आतापर्यंत जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत जनतेची जाहीर माफीही मागितली.



७ देशांच्या तंत्रज्ञानातून साकारला नवा पूल


नव्या 'मिसिंग लिंक' पुलाच्या भक्कमतेची आणि सुरक्षिततेची खात्री खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिली आहे. या पुलाची बांधणी इतकी मजबूत करण्यात आली आहे की, तो ताशी २४० किलोमीटर वेगाच्या भयंकर वाऱ्यांनाही सहज तोंड देऊ शकतो. यापूर्वी कोकणात धडकलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग ताशी १३० किमी होता. यावरून या पुलाच्या प्रचंड क्षमतेचा अंदाज येतो आणि त्यामुळे याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका बाळगण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा 'केबल-स्टे' पूल केवळ देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना ठरला आहे. या भव्य आणि अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी तब्बल सात देशांचे सहकार्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुलाचे डिझाइन कॅनडामध्ये तयार करण्यात आले, तर काही महत्त्वाच्या चाचण्या डेन्मार्कमध्ये पार पडल्या. केबलचे उत्पादन मलेशियामध्ये झाले, अग्निशमन सुरक्षेच्या चाचण्या स्पेनने केल्या, पुलाचे आलेखन तैवानमध्ये करण्यात आले, आणि केबल तज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले होते.



२४ तास सीसीटीव्हीची नजर अन् लेनची शिस्त अनिवार्य


नव्याने सुरू झालेल्या 'कनेक्टिंग लिंक' (पूर्वीची मिसिंग लिंक) प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण पुलावर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा असणार असून, अत्याधुनिक 'व्हेंटिलेशन' (हवा खेळती राहण्याची) प्रणाली बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर वाहनचालकांना 'लेनची शिस्त' पाळणे सक्तीचे करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई (चलान) केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या प्रवासाबद्दल माहिती देताना सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करताना राज्य सरकार आणि परदेशी सल्लागारांसमोर अनेक मोठी आव्हाने उभी राहिली होती. मात्र, या सर्व अडचणींवर खंबीरपणे मात करत टीमने हे काम पूर्णत्वास नेले. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि उत्तम व्यवस्थापनाचा आदर्श नमुना असलेला हा प्रकल्प केवळ वाहतूक कोंडीच सोडवणार नाही, तर मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये जागतिक दर्जाची भर घालणारा ठरेल, असा सार्थ विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना जो नाहक मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत जनतेची जाहीर माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या व्हिडिओचा संदर्भ देत त्यांना थेट लक्ष केले. "सुप्रियाताई, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकण्याची ही शेवटचीच वेळ असेल, कारण यापुढे तुम्ही कधीच वाहतूक कोंडीत अडकणार नाही. तुमच्या सरकारने जे काम रखडवले होते, तेच काम आमच्या सरकारने पूर्णत्वास नेले आहे," असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. याचबरोबर, कामगार दिनाचे औचित्य साधून फडणवीस यांनी या 'मिसिंग लिंक' प्रकल्पासाठी रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या सर्व मजुरांच्या श्रमाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे शक्य झाल्याचे सांगत त्यांचे विशेष आभार मानले.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली