Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या पत्नीचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, त्याच पतीने आपल्या पत्नीचा क्रूर पद्धतीने जीव घेतला. कारण ठरलं चारित्र्याचा संशय.
नवादा जिल्ह्यातील कौआकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरमा गावात राहणाऱ्या रवी मांझी याने आपली पत्नी बबीता कुमारी हिची चाकूने वार करून क्रूर पद्धतीने हत्या केलीय. रवी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या पडत होत्या, ज्याचा शेवट अशा दुर्दैवी हत्येत झाला.
रवी मांझी आणि बबीता कुमारी रूपौ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरेदा गावातील रहिवासी होते लग्नानंतर त्यांचा संसार फुलला आणि त्यांना सात मुले झाली, मात्र एवढा मोठा परिवार असूनही पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाची जागा संशयाने घेतली. प्राथमिक माहितीनुसार, रवि अनेकदा बबीतावर विनाकारण संशय घेत असे आणि घरात यावरून दररोज भांडणे होत असत. हा वाद एक दिवस इतका भयानक वळण घेईल आणि हत्येपर्यंत पोहोचेल, अशी कल्पना कुटुंबातील कोणीही केली नव्हती. ( Bihar Crime News )
घटनेच्या दिवशी काय घडलं ?
घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली आणि रागाच्या भरात रवीने आपला ताबा गमावला. त्याने घरातील चाकू उचलून पत्नी बबीतावर सपासप वार केले, धक्कादायक म्हणजे ही सर्व घटना त्याच्या मुलांच्या डोळ्यादेखत घडली. मृत महिलेच्या 16 वर्षांच्या मुलाने सांगितले की, त्याचे वडील वारंवार आईवर संशय घेत असत आणि वादादरम्यान वडिलांनी आईच्या छातीत चाकू खुपसला. आईचा आक्रोश ऐकून कुटुंबातील लोक आणि शेजारी मदतीला धावले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या बबीताला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ( Bihar Crime News )
आरोपी पती फरार
या अमानवीय घटनेनंतर आरोपी रवी मांझी फरार झाला आहे . घटनेची माहिती मिळताच कौआकोल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील. या घटनेमुळे दरमा गावात शोककळा पसरली असून सात निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.