- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व देवांच्या आराधना अखेर विष्णूपर्यंतच जातात. विष्णूंच्या विष्णुसहस्त्रनाम नामावरून विष्णूंना अनेक नावाने ओळखले जाते याची जाणीव होते. हरी हेही त्यापैकी एक नांव आहे. विष्णूंची पूजा किंवा आराधना करण्यासाठी काही विशेष नियमांचे पालन केल्यास अधिक फलदायी होते असे पद्मपुराणात सांगितले आहे.
विष्णू पूजकाने प्रातःकाळी उठून मौन धारण करून प्रातर्विधी करावा. शौचाचे वेळी डोक्यावर काहीतरी आवरण ठेवावे. नंतर दंतमार्जन करावे. दात घासण्यासाठी तर्जनी व अंगुलीचा वापर करू नये. तसेच वड, पिंपळ, आवळा, यांनी कधीही दात घासू नयेत. दात आंघोळीपूर्वी घासावे. आंघोळ करताना दात घासू नये. नदीत स्नान करायचे असल्यास नदीच्या पाण्यात उभे राहून दात घासू नये. दात घासल्यानंतर बारा वेळा चूळ भरावी व नंतर स्नान करून देवाचे नामस्मरण करावे.
देवपूजे पूर्वी निर्माल्य व्यवस्थित गोळा करावे. आपणास देवपूजा करणे शक्य नसल्यास पत्नीला सांगावे. त्यानंतर मुलाला तेही शक्य नसेल तर भावाला अथवा बहिणीवर हे कार्य सोपवावे.
देवपूजा करताना लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. देवपूजेची उपकरणे दररोज स्वच्छ करावीत. आर्थिक परिस्थितीनुसार पूजेच्या उपकरणाची भांडी बदलली तरी चालतील. एकाग्र चित्ताने देवपूजा करावी. एकाग्रतेशिवाय केलेली पूजा व्यर्थ आहे. पूजेसाठी मृगासन, व्याघ्रासन, कुशासन अथवा पुष्पासन घ्यावे. मात्र काष्ठासनावर(लाकडी पाटावर) बसून पूजा करू नये. काष्ठासन असल्यास त्यावर रेशमी अथवा लोकरी कापड टाकून मगच पूजा करावी. पूजा करताना तोंड दक्षिणेकडे नसावे. भगवान विष्णूला शंखाने स्नान घालावे. शंख नसल्यास सुवासिक जलात तुलसी पत्र टाकून त्याने स्नान घालावे व नंतर चंदन अथवा पिवळे अष्टगंध लावावे. धृत मिश्रित धूप विष्णूला प्रिय आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा विष्णूला प्रिय असतो. विधीशिवाय; परंतु भक्तीने पूजा करणाराही विष्णू कृपेस पात्र होतो.
पद्मपुराणानुसार विष्णूला पिवळी फुले प्रिय आहेत. ग्रीष्मवृतूत कोणतेही सुगंधी फूल व तुलसी दल विष्णूला अर्पण करावे. पावसाळ्यात कदंब किंवा केतकी, आषाढात शेफाली किंवा मालती किंवा करवीर पुष्प अर्पण करावे. भाद्रपदात सुगंधी फुल व पत्रीने पूजन करावे. भाद्रपद महिन्यात विष्णूला केवड्याचे फूल चुकूनही वाहू नये कारण या महिन्यात केवडा मदिरे समान असतो, असे पद्म पुराणात सांगितले आहे. अश्विन महिन्यात दुर्वांनी पूजन करावे. एक लाख बेल पत्री विष्णूला वाहणाऱ्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्य लाभते. मार्गशीषात लक्ष्मीसह विष्णूचे पूजन करावे.
पाखंडी, खोटे बोलणारे, जेथे नेहमी रडारड व देवतांचा उपहास केला जात असेल तेथे हरीचे पूजन करू नये. कंजूषाच्या घरी हरिपूजन करू नये. विष्णू पूजनानंतर शंखनाद करावा. विष्णूला नैवेद्य दाखविताना तुळस आवश्यक आहे. तुळशीशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत. पूजेचे वेळी अथवा विष्णू आराधनेसाठी ॐ नमो भगवते वासुदेवाय ! हे नामस्मरण करावे.
विष्णू मंदिरात घंटानाद करणारा अभक्ष भक्षणाच्या पातकापासून मुक्त होतो. वीणा वादन करणारा पुढील जन्मी पंडित होतो. मुखवाद्य वाजविणारा हरि कृपेस पात्र होतो. विष्णू मंदिराची स्वच्छता करणाऱ्याचे ब्रह्महत्येचेही पाप नाहीसे होते, असे भागवत व पद्मपुराणतही सांगितले आहे.