इस्लामाबाद : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध भडकले. या युद्धात पाकिस्तान अद्याप थेट सहभागी झालेला नाही. पण युद्धामुळे पाकिस्तानवरच मोठे संकट आले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. कामधंदे ठप्प असल्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. पण लोकप्रतिनिधींकडे पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळच नाही.
अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी शस्त्रसंधीच्या मुद्यावर चर्चेसाठी येणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तानने राजधानी इस्लामाबादमध्ये सामान्यांसाठी अनेक मनाई हुकूम जारी केले आहेत. यामुळे इस्लामाबादमध्ये मागील दहा दिवसांपासून लॉकडाऊन सारखीच स्थिती आहे. सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. बाजारपेठा बंद आहेत. कामधंदे ठप्प असल्यामुळे हातावर पोट असलेल्या बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणे सामान्य नागरिकांसाठी कठीण झाले आहे.
इस्लामाबादमध्ये ठिकठिकाणी जवानांचा पहारा आहे. प्रमुख चौकांमध्ये, अनेक रस्त्यांवर कायम जवानांचा पहारा आणि नाकाबंदी केल्याचेच दिसत आहे. या सुरक्षा व्यवस्थेमुळे सामान्यांसाठी जगणे कठीण झाले आहे.
पाकिस्तान शस्त्रसंधी होणार असल्याचे सांगत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी अधूनमधून एकमेकांना धमक्या देणे, इशारे देणे असे प्रकार करत आहेत. वारंवार अमेरिका आणि इराणकडून परस्परविरोधी दावे सुरू आहेत. यामुळे तणाव वाढत आहे. तणाव कमी होत नाही आणि अघोषीत लॉकडाऊन संपत नाही म्हणून पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.