मुंबई : निवडणुका संपल्या, आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा असा आक्रमक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेवर मोठी जबाबदारी टाकली. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवत संघटना भक्कम करा आणि तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा ठणकावून संदेश त्यांनी वरळीतील राज्यव्यापी मेळावा( महायुवोत्सवात) दिला. “आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास; भगवा आमच्या रक्तात आणि श्वासात आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिस्तीचा ठसा प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात दिसलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
सकाळी सहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी “माझ्यासमोर युवा सेनेचे वाघ आणि युवती सेनेच्या वाघिणी बसल्या आहेत,” असे म्हणत अभिमान व्यक्त केला. युवा सेना ही केवळ संघटना नसून एक विचार आहे, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या युवा सेनेने मराठी माणसाच्या हक्क, न्याय आणि रोजगारासाठी काम करावे, असे ते म्हणाले.
तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते, असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि भगतसिंग यांच्या उदाहरणांचा उल्लेख केला. “जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका; मेहनत आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा संदेश त्यांनी दिला.
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगितला. अनेक संकटे, वादळे आणि दुःखांचा सामना करूनही ते खचले नाहीत. २०२२ मधील उठावानंतर शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिली आणि जनतेनेच खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “चाळीसपैकी एक जरी आमदार निवडून आला नसता तर शेती करायला गेलो असतो; पण साठ उमेदवार हे आमदार निवडून आले,” असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी युवा सेनेवर असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत असून तरुणांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असताना “पायाला भिंगरी लावून” संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, असे सांगत त्यांनी विविध योजना राबवल्याचा उल्लेख केला. “लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ” ही ओळख माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगत त्यांनी संपत्तीपेक्षा माणसे कमावणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. कार्यकर्त्यांना “तहान-भूक विसरून काम करा” असा संदेश देत त्यांनी लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या समजून घ्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि त्यांच्या अश्रूंना हात द्या, असे आवाहन केले.
अतिवृष्टीच्या काळात दसरा मेळावा न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. “जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना” हे ब्रीदवाक्य त्यांनी अधोरेखित केले. “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या देखील कार्यकर्ताच राहणार आहे ,” असे सांगत त्यांनी शिवसेना ही कार्यकर्त्यांचीच संघटना असून येथे कोणी मालक नाही, सर्व समान आहेत, असे स्पष्ट केले. कोणतेही पद किंवा आडनाव महत्त्वाचे नसून कुवत महत्त्वाची आहे. काम करणाऱ्यालाच संधी मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.
सामान्य कुटुंबातील डॉ. ज्योती वाघमारे राज्यसभेवर पोहोचल्याचे उदाहरण देत त्यांनी शिवसेनेतून कोणालाही मोठी संधी मिळू शकते, असे सांगितले. मंत्री योगेश कदम यांसह अनेक कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी केला.
तरुणांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा, असे स्पष्ट आवाहन केले. प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे आवश्यक असून उद्योगशीलता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून तीन हजार बसस्टॉपवर स्टॉल उभारून कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट, नाटक, वेब सिरीजसारख्या क्षेत्रांतही मराठी तरुणांनी पुढे यावे, त्यांना संरक्षण देण्याचे काम युवा सेनेने करावे असे ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणावर बोलताना त्यांनी महिलांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधकांवर टीका करत काश्मीर खोऱ्यातही शिवसेनेने आंदोलन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. वंचित, दुर्बल घटक, शेतकरी, महिला यांचा आवाज बना, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत युवकांनी सूचना द्याव्यात, असे सांगत त्यांनी संघटनात्मक कामांवर भर दिला. मतदार यादी अचूक ठेवणे, बीएलए-१ आणि बीएलए-२ प्रक्रियेत सहभाग घेणे, सदस्य नोंदणी वाढवणे आणि “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम परदेशात पाठवण्यात आली तसेच इंडोनेशियाशी संबंध दृढ करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
“खऱ्या सोन्याची झळाळी लपत नाही, तसेच खऱ्या विचारांची चमक लपत नाही,” असे सांगत त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा संदेश दिला. शेवटी “मेहनत करने से हर काम सफल हो जाता है… संघर्ष के बिना जीत नहीं मिलती,” असा संदेश देत त्यांनी भाषणाची सांगता केली.
या कार्यक्रमात बीच प्लीज इंडिया संस्थेचे अध्यक्ष मल्हार कळंबे आणि हॉटेल शौर्य वाडाचे मालक विकास हांडे यांना ‘शिवगौरव’ पुरस्कार देण्यात आला. युवा सेनेच्या नवीन संकेतस्थळाचे, ‘युवा स्क्वॉड’ उपक्रमाचे आणि नव्या युवागीताचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.