मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबससह सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या अद्ययावत 'एटीएस' प्रणालीमुळे गेल्या काही काळापासून व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण पूर्णतः बंद झाले होते. विशेषतः राज्यातील ११ महत्त्वाच्या आरटीओ क्षेत्रांतील कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला होता. परवाना नूतनीकरण रखडल्याने रिक्षाचालकांपासून ते स्कूलबस मालकांपर्यंत सर्वांनाच कायदेशीर अडचणींना आणि आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत होते.
या समस्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना पत्र लिहून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नूतनीकरण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत केंद्राने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
कुणाला होणार फायदा?
- रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मुदत संपलेल्या परवान्यांमुळे होणारी कारवाई टळणार.
- शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना स्कूलबस आणि टेम्पो परवाना प्रक्रियेतील अडथळा दूर.
- ११ आरटीओ क्षेत्रातील रखडलेली हजारो प्रकरणे निकाली काढण्यास मिळणार वेळ.