विनोदाच्या काट्यावरचा अत्यंत हलका भोपळा

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


आचार्य अत्र्यांनी आपल्या लेखन कारकिर्दीत एकूण २५ नाटके लिहिली. त्यातले भ्रमाचा भोपळा हे चौथे नाटक. १९३५ साली लिहिलेल्या पूर्णतः काल्पनिक प्लॉटवर फँटेसी स्वरुपात जगणाऱ्या केचेश्वराची ही कथा आहे. अतिशयोक्तीपूर्ण अतिरंजित पात्रांच्या संवादातील विनोदी शैलीवर फ्रेंच नाटककार मोलियरचा प्रभाव जाणवतो. इंग्रजी साहित्यातील 'बर्लेस्क' (Berlesque) हा प्रकार आचार्य अत्र्यांनी मराठीत प्रथमच रंगभूमीवर आणला. बर्लेस्क ही एक प्रकारची साहित्यिक, नाट्य किंवा संगीतमय रचना आहे जी गंभीर विषयांना अतिशयोक्तीपूर्ण किंवा विनोदी पद्धतीने अंगविक्षेप करून हसवण्याचा प्रयत्न करते. गंभीर गोष्टींना मूर्खांसारखे दाखवले जाते किंवा तुच्छ गोष्टींना गंभीरपणे सादर केले जाते, ज्यामुळे उपहास किंवा हास्य निर्माण होते. हे सटायरचे एक रूप आहे आणि अनेकदा पॅरेडीशीही मिळते-जुळते पहावयास मिळते. बर्लेस्क आणि व्यंग्य हे दोन्ही हास्य आणि उपहासावर आधारित साहित्यिक तंत्र आहेत, पण त्यांच्यात शैली आणि उद्देशात फरक आहे. बर्लेस्क ही अतिशयोक्तीपूर्ण आणि अंगविक्षेपी नक्कल (पॅरेडी, ट्रावेस्टी किंवा कॅरिकेचर) करून गंभीर विषयांना मूर्खांसारखे किंवा तुच्छ गोष्टींना गंभीरपणे दाखवणारी पद्धत आहे, ज्यामुळे थेट हास्य निर्माण होतेच परंतु व्यंग्य हे सामाजिक दोष, व्यसने किंवा अन्यायावरून टोमणे मारणारे असते, जे अप्रत्यक्षपणे (आयरनी, अंतर्विरोध) शहाणपणाचा आणि सुधारणेचा संदेश देते. त्यामुळे भ्रमाच्या भोपळ्याचा विनोद 'परीहास' प्रकारात गणला जातो, (प्रहसन प्रकारात नव्हे, तो आणखी एक वेगळा प्रकार आहे.) अत्र्यांनी भ्रमाच्या भोपळ्यातील प्रस्तावनेत अथवा कुठल्या तरी भाषणात एक मजेशीर वाक्य लिहिल्याचे आठवते. ते लिहितात, घराबाहेर (हे नाटकाचे नाव आहे) पडल्यानंतर विनोदी लेखनाच्या भ्रमाचा भोपळ्याला साष्टांग नमस्कार (नाटकाचे नाव) घातल्याने 'जग काय म्हणेल'(नाटकाचे नाव) हा विचार न करता 'मी उभा आहे...!'(नाटकाचे नाव). आचार्य उर्फ प्रल्हाद केशव अत्रे हे उत्तम मार्केटर होते. भ्रमाचा भोपळा हे खरंतर चार अंकी संगीत नाटक आहे, परंतु त्यातील संगीत काढून टाकल्यास किंवा संवाद कमी केल्यास नाटकाच्या कथावस्तूवर परिणाम होणार नाही याची अत्र्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आढळते. मुळातच पुस्तकाची तिसरी आवृत्ती एडिटेड व्हर्जन आहे. त्यामुळे नुकत्याच रंगभूमीवर दाखल झालेल्या दोन अंकी रंगीत भोपळ्याची रंजकता कुठेही कमी होत नाही.


नाटकात एक श्रीमंत व्यक्ती आणि त्याच्या घरातील लोक यांच्यातील भ्रमामुळे उद्भवणाऱ्या गोंधळाचे वर्णन आहे. एका सामान्य माणसाला श्रीमंत व्यक्ती समजून सर्वजण सेवा-सत्कार करतात, ज्यामुळे हास्यपूर्ण प्रसंग घडतात आणि शेवटी भ्रम उघड होऊन सामाजिक व्यंग्य नजरेस पडते. त्यातही गोंधळाच्या विनोदी परिस्थितींवर, ज्यात सामाजिक दंभ आणि मानवी कमकुवतपणाच्या उपहासपूर्ण बाजूंचे चित्रण केले जाते. यातील संवादात उपहास आणि विडंबन भरपूर आहे, जो प्रेक्षकांना भावला अन् भोपळा मराठी रंगभूमीवर सदाबहार ठरला. बर्लेस्क शैली आजवर मराठीतील तीन नटांना जमली हा आजवरचा माझा अभ्यास सांगतो. पैकी दामुअण्णा मालवणकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि संजय नार्वेकर. बर्लेस्कमधे सात्विक आणि आंगिकचे सिंंक्रोनायझेशन इतके परफेक्ट लागते की बघणाऱ्याला प्रश्न पडावा की मी त्याच्या एक्सप्रेशनला हसू की मुव्हमेंटला. ही त्या त्या नटामधे अंगीभूत असावी लागते हा माझा दावा आहे. शिवाय अशा क्षमतेचे नट निवडणे ही दिग्दर्शकिय स्ट्रेंग्थ या नाटकात दिसून येते. या आधी ती 'सर्किट हाऊस' या नाटकात दिसून आली होती. तशीच व्यंगचित्रे अत्र्यांनी भ्रमाच्या भोपळ्यात रेखाटली आहेत. साधारण ९० वर्षांपूर्वी सादर झालेले नाटक आणि त्यातील प्रेक्षकांना अपेक्षित विनोद आणि आताच्या प्रेक्षकांना अपेक्षित असलेल्या विनोदाच्या समज-पातळीत निश्चितच फरक असणार आणि त्यासाठी रंगावृत्ती करताना डाॅ. श्वेता पेंडसे यानी पात्र निवड झाल्यावरच ती एडिट अथवा त्यावरील प्रक्रियेस हात घालायला हवा होता. नाटकाचा बाज हा बर्लेस्क पद्धतीचा असल्याने त्यावर दिग्दर्शकिय संस्कार होणे अत्यंत गरजेचे होते. काही कलाकारांच्या बाबतीत ते जाणवत नाही. उगा त्या नटांची नावे घेऊन त्याना नाऊमेद करणे योग्य नाही कारण नाटक ही प्रोसेस आहे, हळूहळू नाटक मॅच्युअर होत जातं, यावर माझा विश्वास आहे. मुळात जुन्या बाजाचा आऊटडेटेड विनोद कॅरी करुन चोख हशे वसूल करणारा केवळ संजय नार्वेकरच या नाटकात दिसत राहातो. बाकी साथीला चेतना भट, शुभंकर तावडे, वरद चव्हाण आणि सुनिल तावडे त्यातल्या त्यात लक्षात राहतात. संदर्भहिन आणि कालबाह्य ठरलेली नाटके रिकंस्ट्रक्ट करता येतात आणि विजय केंकरे यानी ती या अगोदर करुन घेतली आहेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली देखील आहेत; परंतु या नाटकाची केमिस्ट्री थोडी चुकल्यासारखी वाटली. मी मुद्दामच या नाटकाचे निरीक्षण थोडे उशिरानेच या करिता लिहिले की नाटकाला वेळ दिला की ते परिपक्व होते. श्रीकांत तटकरे आणि संतोष काणेकर हे निर्माते वेळ साधून नाट्य निर्मिती करणारे म्हणून ओळखले जातात. आणखी काही प्रयोगात मुंबईतला भोपळ्याचा प्रेक्षकवर्ग 'संपला' असे म्हणायला वाव आहे. नाटक कुठलेही असो ते जगावे असे वाटंत असताना "भ्रमाचा भोपळा" फुटू देऊ नको रे म्हाराजा...!

Comments
Add Comment

Mrunmayee kadam : ‘बाप कमावतोय तर कामाची गरज काय?’ ट्रोलरला भाऊ कदमांच्या लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम हे प्रेक्षकांचे कायमच आवडते कलाकार राहिले आहेत. ‘चला हवा

'Raja Shivaji' Movie 'Phool Parijat' Song : 'राजा शिवाजी'मधील ‘फूल पारिजात’ गाणं रिलीज; सईबाई आणि महाराजांच्या नात्यातील प्रेमाची भावूक झलक

मुंबई : जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) निर्मित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) या भव्य ऐतिहासिक

Great Purge of 2026 : इन्स्टाग्रामच्या ‘ग्रेट पर्ज २०२६’मुळे खळबळ! विराट, प्रियांका, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रिटींचे लाखो फॉलोअर्स गायब

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका रात्रीत मोठा बदल पाहायला मिळाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Celina Jaitly : मुलाच्या कबरीजवळ सेलिना जेटलीला अश्रू अनावर; म्हणाली, “लग्नाने सर्व काही हिरावलं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) सध्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आणि कठीण टप्प्यातून जात आहे.

Vijay Thalapathy 'Sarkar' Movie : रील लाईफ ते रिअल लाईफ! विजयच्या सिनेमातील नंबर प्लेटची जोरदार चर्चा

तामिळनाडू :  दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर

Sunita Ahuja : सुनीता आहुजाची आता ‘लॉकअप २’ मध्ये दमदार एन्ट्री; एकता कपूरच्या शोमध्ये रंगणार नवा ड्रामा

मुंबई : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आता थेट जेलमध्ये जाणार? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पण हे