मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायत्री लवकरच लग्न करणार असून काही दिवसांआधी तिनं तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. तिचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे. पण, त्याआधीच गायत्रीच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळे अभिनेत्री गायत्री दातार प्रचंड घाबरली असून तिला तिच्या बिल्डिंगमधून बाहेर पडायलाही भीती वाटत आहे. तिच्याबरोबर घडलेला हा धक्कादायक प्रकार गायत्रीनं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितला आहे.
गायत्री दातार मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिनं कॅब बुक केली पण थोड्या वेळातच कॅन्सलही केली. त्यानंतर आता कॅब ड्राइव्हर तिला त्रास देत असून शिवीगाळ करत आहे. यामुळे गायत्री दातार प्रचंड घाबरली आहे. नेमकं काय झालं हे गायत्रीनं पोस्टमध्ये सांगितलं.
गायत्रीनं पोस्टमध्ये लिहिलंय, "@indrive.in मी आज सकाळी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. पण मला पॅकिंगसाठी जास्त वेळ लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर ती कॅब ड्रायव्हर येण्याआधीच मी कॅन्सल केली." "त्यानंतर गेल्या २ तासांपासून तो ड्रायव्हर वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन करून मला त्रास देत आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की मला माझ्या सोसायटीतून बाहेर पडायलाही भीती वाटतेय. मी अक्षरशः रडत आहे." "मला खूपच भीती वाटते आहे कारण त्यानं मला अनेक वेळा फोन करून शिवीगाळ केली आहे. तो ज्या अनेक नंबरवरून फोन करत आहे त्यामुळे तो माझा पाठलाग करू शकतो आणि मला काहीतरी इजा पोहोचवू शकतो अशी भीती वाटत आहे. InDrive सपोर्टकडूनही काहीच मदत मिळत नाही."
गायत्रीने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.गायत्री सध्या, 'सीरियल किलर' या मराठी नाटकात काम करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्रेक्षकांचा या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टनंतर गायत्रीनं अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही. ती सुखरूप असावी अशी प्रार्थना तिचे चाहते करत आहेत.