Sunday, April 5, 2026

Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (६ एप्रिल) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati Assembly by-election) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून सोमवार ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी अजित पवार यांच्या जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (NCP) घेतला आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री, आमदार, पदाधिकारी, पवार कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित असतील.

पवार कुटुंबियांच्या परंपरेनुसार सकाळी श्री क्षेत्र कण्हेरी येथील मारुतरायाचे दर्शन घेत त्या विद्या प्रतिष्ठानवरील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी जाणार आहेत. तेथून बारामतीतील कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्या नंतर इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी त्या अभिवादन करतील. त्या नंतर साडेदहा वाजता कविवर्य मोरोपंत सभागृहात मेळावा होणार असून तेथे त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तेथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे जातील.

पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे - मुख्यमंत्री

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वच पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

"सुनेत्रा पवार यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रात यापूर्वीही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. जेव्हा आर. आर. आबांचे दुःखद निधन झाले होते, तेव्हा भाजपने मोठेपणा दाखवत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि ती निवडणूक बिनविरोध केली होती," अशी आठवण फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करून दिली.

Comments
Add Comment