श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ कारणावरून दगडफेक झाली आणि तोडफोड करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या १५ ते २० साथीदारांसह दुकानावर हल्ला चढवला. यावेळी दुकानासमोरील काऊंटरची काच फोडण्यात आली तसेच खुर्च्या, प्लेट्स यांची तोडफोड करण्यात आली. दुकानातील मालाची नासधूस करून नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले की, ही घटना पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादातून घडली असून यामागे कोणताही पूर्वीचा वाद नाही. तसेच या घटनेला जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.