मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक ‘डीजी ॲप’च्या माध्यमातून डिजिटल ओळखपत्रे वितरित केली जातात. मात्र, ही ओळखपत्रे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता कंत्राटदार कंपनीने तांत्रिक डेटाच्या आधारे अशा व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू केले आहे.
ज्या अभ्यागतांकडे ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना थेट फोन करून कार्ड परत करण्याची विनंती केली जात आहे. अभ्यागत कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, याची संपूर्ण नोंद संगणकीय प्रणालीत उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणे प्रशासनाला सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० कार्ड्स परत जमा करण्यात आली आहेत.
प्रवेशासाठी नवे नियम
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, यापुढे ज्या नागरिकांकडे जुने ओळखपत्र राहिले आहे, त्यांना ते जमा केल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग केले जात असून, अभ्यागतांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.