मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सोमवारी रात्री अर्धा पडदा पाडल्यानंतर मंगळवारी याचे कार्यालयीन आदेश जारी करत यावर पूर्णच पडदा गेला. आयुक्तपदी आश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी सकाळी जारी झाल्यानंतर लोकांचा विश्वास त्यावर पडला. मात्र, महापालिका आयुक्तपदी केवळ आणि केवळ आश्विनी भिडे यांची नियुक्ती होण्यामागील मुख्य उद्देश हाच होता तो म्हणजे, त्यांच्या कामाची चोखपध्दत, परखडपणा आणि सध्या महापालिका ज्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे,त्याला आर्थिक शिस्त लावणे हेच आहे. त्यामुळे आजच्या घडीला कोणताही अन्य अधिकारी आयुक्तपदी नियुक्त झाला असता तर महापालिकेचा आर्थिक डोलारा त्यांना सांभाळणे कठीण गेले असते जे केवळ भिडे यांना सोपे जाणार आहे. त्याचमुळे भिडे यांच्याशिवाय महापालिकेला पर्याय नसल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात होते.
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या सुमारे ८१ हजार कोटी रुपयांचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी केला. परंतु मुंबई महापालिकेने तब्बल २ लाख ४४ हजार कोटींच्या पायाभूत विकासकांमे हाती घेतलेली आहेत. ही विकास कामे हाती घेताना कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून आतापर्यंत हाती घेतलेल्या या कामांना गती देतानाच अतिरिक्त कोणतीही कामे प्रस्तावित करू नये आणि प्रसंगी कोणत्याही प्रकारची कामे करण्याचा दबाव आला तर ते स्पष्टपणे सांगणारे, तसेच दबाव खूपच वाढला तर मुख्यमंत्र्यांनाही त्या कामाचे महत्व किती आहे हे पटवून देत ते काम त्वरीत घेण्याची गरज आहे की नंतर हाती घेणे योग्य आहे याबाबत स्पष्टपणे सांगण्याची हिंमत आश्विनी भिडे यांच्यात आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत भिडे यांच्याशिवाय अन्य कोणताही अधिकारी या पदाला न्याय देवू शकत नाही किंवा आर्थिक काटकसरीच्या उपाययोजना आखण्याइतप सक्षम नाही. त्यामुळेच भिडे वगळता अन्य कुठल्याही सनदी अधिकाऱ्याची यापदावर वर्णी लागली असती तर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिक कमकुवत होण्याची अधिक शक्यता आहे. तर केवळ भिडे यांच्या हाती महापालिका आयुक्तपदाची सुत्रे आल्यास किमान आर्थिक स्थिती समांतर तथा कायम ठेवण्यात त्या यशस्वी ठरतील. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती कायम राहिली तरच भविष्यात मुंबईला आर्थिक डोलारा मजबूत राहिल, असा कयास सर्वच अधिकाऱ्यांकडून तसेच निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आश्विनी भिडे यांनी महापालिकेत मे २०२०पासून अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे, त्यानंतर दीड वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या कारभाराची आणि पर्यायाने अधिकाऱ्यांच्या कामाची पध्दत चांगल्याप्रकारे अवगत असल्याने त्यांना महापालिकेत आर्थिक शिस्त लावतानाच काटकसरीच्या उपायोजनांना बळ देण्यात यश येईल असे बोलले जात आहे. त्यातच थेट मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्याची त्यांची हिंमत असल्यामुळे महापालिकेतील कुठल्याही राजकीय दबावाला तसेच अन्य दबावाला बळी न पडता त्या आपल्या निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचू शकतात, जे कौशल्य अन्य अधिकाऱ्यांमध्ये नसते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी आश्विनी भिडे यांच्याशिवाय अन्य नाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह इतर मुंबईकरांच्या तोंडावर नव्हते. पुढील काही वर्षांत मुंबई महापालिकेला तारण्यासाठी हेच एकमेव व्यक्तीमत्व होते आणि महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करून मुंबईकरांचे स्वप्न साकार करण्यात आले.






