मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी आभार व्यक्त केले आहेत.
राष्ट्रपती दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षामुळे श्रीलंकेला इंधन पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की भारताने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि त्यासाठी ते भारताचे आभारी आहेत.
शनिवारी कोलंबो येथे ३८,००० मेट्रिक टन इंधन पोहोचले. सध्याच्या संकटाच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पूर्ण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करत त्यांचे आभार मानले.दरम्यान भारताने श्रीलंकेला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेकदा मदत केली आहे.