नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने पोलीस तपासात स्पष्ट केले की, तो महिलांशी गोड बोलून त्यांचे कौतुक करत होता. तसेच भावनिक जवळीक वाढवून त्यांना जाळ्यात ओढत होता. 'तू खूप सुंदर आहेस', 'तुझा पती तुला समजून घेत नाही', 'तुझी खरी क्षमता कोणालाच कळत नाही' अशा वाक्यांनी तो महिलांवर प्रभाव पाडत होता, असे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात माइंड रीडिंगमध्ये स्वत:ला पटाईत असल्याचे भासवत होता. परंतु प्रत्यक्षात तो समोरच्या भावनिकतेचा, मानसिकतेचा आणि देहबोलीचा अभ्यास करुन त्यांच्याशी संवाद साधत होता. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून त्यावर तो संवाद साधत असे. या पद्धतीने तो महिलांना मानसिकदृष्ट्या जखडून ठेवत असल्याचा आरोप आहे. चौकशीत त्याने भावनिक जाळं विणून विश्वास मिळवल्याची कबुली दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
किती महिलांना फसवले?
दरम्यान, किती महिलांचे शोषण केले याबाबत विचारले असता खरातने स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. "नेमका आकडा सांगता येणार नाही," असा दावा खरातने केल्याचे सूत्रांकडून समजले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.