मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो, कोकण आणि अमरावती विभाग तसेच सांगली जिल्ह्याला नवे प्रशासकीय नेतृत्व मिळाले आहे.
मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची आता महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची मुंबईतील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आता डॉ. मैनाक घोष यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे असून २०१९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. घोष यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी प्रियमवदा म्हाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या प्रियमवदा या २०२२ च्या बॅचच्या अधिकारी असून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून १३ वा क्रमांक पटकावला होता. याचबरोबर, एम. देवेंद्र सिंग यांची मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राहुल रेखावार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव पदी वर्णी लागली आहे.