काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर भारत-नेपाळ संबंधांबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर लगेचच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
मोदींचे अभिनंदन, शाह यांचा प्रतिसाद
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरून शाह यांचे अभिनंदन करत भारत-नेपाळमधील ऐतिहासिक मैत्री अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याला उत्तर देताना शाह यांनी ही सकारात्मक भूमिका घेत, दोन्ही देशांच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे, एक्स वर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध पून्हा एकदा दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय घडामोडींनी वाढवली खळबळ
दरम्यान, सत्तेत आल्यानंतर बालेन शाह यांनी कठोर निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्र्यांवर कारवाई केल्याची चर्चा रंगली असून, प्रशासनात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. या निर्णयांमुळे नेपाळच्या राजकारणात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनावरही कडक नजर
नव्या सरकारने केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
नव्या नेतृत्वाकडे जगाचे लक्ष
तरुण आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे बालेन शाह आता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने नेपाळमध्ये मोठे बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निर्णयांमुळे राजकीय स्थैर्य टिकेल का, की नव्या संघर्षाला सुरुवात होईल, याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष लागले आहे.