इराण युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अनेक दिवस अडकून पडलेले भारतीय ध्वजधारी ‘जग वसंत’ हे जहाज अखेर भारतात पोहोचले आहे. भारतीय ध्वज असलेले हे जहाज आज म्हणजेच शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी गुजरातमधील बंदरावर दाखल झाले.
गेल्या काही दिवसांत भारतीय ध्वजधारी ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ या दोन जहाजांनी होर्मुज सामुद्रधुनी पार केली होती. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, मागील सोमवारी ही दोन्ही जहाजे इराणमधील लारक आणि केश्म बेटांदरम्यान दिसून आली होती. पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेल्या २२ भारतीय जहाजांपैकी ही दोन्ही जहाजे होती.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज सामुद्रधुनी अंशतः बंद केल्याने जगभरातील तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ या जहाजांवर एकूण ९२,६१२ मेट्रिक टन एलपीजी गॅस भरलेली आहे. ‘जग वसंत’ जहाजावर ३३ भारतीय नाविक, तर ‘पाइन गॅस’वर २७ भारतीय नाविक कार्यरत आहेत.
यापूर्वी ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही भारतीय जहाजेही सुमारे ९२ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात पोहोचली होती. भारतात घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी एलपीजीची मोठी मागणी असल्याने होर्मुज सामुद्रधुनी बाधित झाल्यानंतर देशात एलपीजी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, भारत सरकारने कूटनीतिक पातळीवर इराणशी चर्चा करून भारतीय जहाजांच्या सुरक्षित हालचालीची व्यवस्था केली. इराणनेही अधिकृत निवेदन जारी करून भारतीय जहाजांना अडवले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.