नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत होत आहे. राज्यात शंभर कोटी रुपयाचा व्यवहार बचत गटाच्या माध्यमातून होत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले .
या प्रसंगी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री कृपाल तुमाने, कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर आदी लोकप्रतिनिधी उपस्थिती होती.
महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये सुमारे ४०४ स्टॉल्स उभारण्यात आले असून आतापर्यंत १० कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही विक्री पुढील काळात मोठया प्रमाणात वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात ३ ठिकाणी महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरविण्यात येते आणि या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे महिलांच्या उद्योगाना मोठी चालना मिळत असून पुढे त्यांना अधिक संधी निर्माण करून देण्याचे काम शासन करणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून महिला अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटक बनल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात ‘लखपती दीदी’अभियानांतर्गत १ कोटी महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हे मॉल उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले. नागपूर येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन अत्यंत उत्तम झाले असून यासाठी १०० पैकी १०० गुण आयोजकांना देतो आणि महिलांसाठी महालक्ष्मी सरस च्या माध्यमातून मिळणारी हक्काची बाजारपेठ दरवर्षी नागपुरात उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिलांचे कौशल्य वाढविणे, त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करणे आणि त्यातून त्यांची उत्पादने परदेशात पाठविण्यासाठी शासन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवसखी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम मंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात योजना आखून 1 लाख रुपये महिला बचत समूहाना उपलब्ध करून दिले. आणि त्यातून खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम होत आहे, असे मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.
यावेळी नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीदी की रसोई उपहारगृह, प्रोजेक्ट ड्रीम १०० विलेज लायब्ररी, १४ आय सी टी लॅब झेड. पी. स्कूल, ए आय लॅब ऑन व्हील- ज्ञानरथ, सुपर ४० अंगणवाडी, गुरुकुल ए आय लॅब ४८ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत १०० पेक्षा अधिक वाचनालये उभारण्यात येणार असून या उपक्रमाचा देखील शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
सोबतच महालक्ष्मी सरस येथील महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची विक्री, बाजारपेठेतील प्रतिसाद आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
तसेच उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उमेद अभियानाचे मुख्य परिचलन अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालिका अंशूजा गराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी उमेद अभियानाचे जिल्हा व तालुका कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रसंगी आभार अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी मानले, तर सूत्रसंचालन अमोल बाविस्कर यांनी केले.