मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता या रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील सत्तेच्या वाटणीनुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, ते मिळवण्यासाठी पक्षांतर्गत 'लॉबिंग' सुरू झाले आहे. सध्या आमदार सरोज अहिरे, वैशाली नागवडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावे शर्यतीत असल्याचे समजते.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर चाकणकर तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीत चाकणकर यांनी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता दबाव पाहता, पक्ष आणि सरकारची प्रतिमा जपण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला.
दरम्यान, चाकणकरांच्या गच्छंतीनंतर भाजप आणि शिवसेना या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे पद सोडण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या पक्षाचा कोटा कायम राखण्यासाठी आग्रही आहेत. त्यानुसार त्यांनी पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे नाव यात आघाडीवर आहे. खरात प्रकरण नाशिकशी संबंधित असल्याने तिथल्याच आक्रमक महिला नेत्याला संधी देऊन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि पक्षातील सक्रिय चेहरा म्हणून वैशाली नागवडे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. त्याशिवाय राजलक्ष्मी भोसले यांच्यासाठीही पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. पुण्याच्या माजी महापौर म्हणून त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरीकडे, जळगावच्या प्रतिभा शिंदे यांच्या नावावर देखील खल झाला. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना आव्हान देण्यासाठी शिंदे यांचा चेहरा वापरता येऊ शकेल. उत्तर महाराष्ट्रात त्यांनी बांधलेले संघटनात्मक काम त्यांच्या पथ्यावर पडू शकते, असेही बोलले जात आहे.
कोणाच्या गळ्यात माळ पडणार?
या चार नावांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की एखादे अनपेक्षित नाव समोर येते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. जोपर्यंत नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आयोगाचा दैनंदिन कारभार सचिव किंवा एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.