मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज झालेले माजी खासदार राहुल शेवाळे यांची मनधरणी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकलेल्या शेवाळे यांच्यावर लवकरच केंद्रात पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते.
राज्यसभेसाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारखे दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी अनपेक्षित उमेदवार दिला गेल्याने हे नेते, विशेषतः राहुल शेवाळे तीव्र नाराज होते. गेल्या आठवडाभरापासून ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मंत्री उदय सामंत यांच्याकडून सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री सामंत हे शेवाळेंना घेऊन दिल्लीला रवाना झाले. तिथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत शेवाळेंना केंद्रातील महत्त्वाच्या जबाबदारीचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही, याचा फटका शेवाळेंना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणुकीची सर्व धुरा शेवाळे यांच्यावर होती. उबाठा गटातील अनेक माजी नगरसेवक सोबत आल्याने ५० ते ६० नगरसेवक निवडून येतील असा कयास बांधला जात होता. मात्र, अपेक्षित निकाल न लागल्यानेच शेवाळे यांची राज्यसभेची उमेदवारी कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कोणती जबाबदारी मिळणार?
दरम्यान, दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल," अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या शेवाळे यांच्याकडे आता दिल्लीतील कोणती संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाते आणि त्यानंतर त्यांची नाराजी खरोखर दूर होते का, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.