मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि उबाठाकडून केली जात असल्याचा आरोपच महापौर रितू तावडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचा तुडवटा नसून ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे मुंबईच्या जनतेने कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावून तासनतास गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावू नये तसेच अधिक दराने गॅस सिलिंडरही खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.
मुंबईतील अनेक उपहारगृहांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काहींना कोळशाच्या चुली निर्माण केल्या आहेत, तर काहींनी इलेक्ट्रीक शेगड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही बेकऱ्यांनी लाकडे वापरुन भट्टी चालवण्याची मागण केली आहे. याबाबत पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी मुंबईत कशाप्रकारची आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली नाही. जिथे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केली जाते, ती केवळ काँग्रेस आणि उबाठाच्यावतीने अफवा पसरवल्यामुळे होते. अशाप्रकारच्या अफवा पसरवल्यामुळे गॅस मिळवण्यासाठी लोक चार ते पाच तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच यासाठी अधिकही पैसे मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुंबईमध्ये २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध होतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी रांगेत उभे राहून गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच या अफवांवर विश्वासही ठेवू नये. या अशा अफवांमुळे गॅसचा काळा बाजार होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनीही याची काळजी घ्यावी आणि लोकांना अशाप्रकारच्या काळा बाजार होण्यापासून रोखले जावे अशी सूचना केली. तसेच मुंबईकरांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.