मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षापर्यंत करण्यासाठी केंद्रशासनाकडे विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ वर्ष २०२५-२६ मध्ये अमली पदार्थ तस्करीच्या १० प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. नागपूरमध्ये मागील ११ महिन्यांत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत ९०७ कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १ हजार २५४ किलो अमली पदार्थ पकडण्यात आले. त्यांचे मूल्य १० कोटी रुपये होते. सध्या छोट्या जागेतही अमली पदार्थ बनवण्याचे प्रकार चालत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे अन्य राज्यांतही आहेत. अन्य राज्यांत जाऊनही आपण कारवाया केल्या आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पोलिसांचा थेट सहभाग आढळल्यास पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल’’, असेही त्यांनी सांगितले.