मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांचा भाजपाचे चांगला समाचार घेतला. भाजपची सत्ता आल्यानंतर बांग्लादेशी मुस्लिम, रोहिंग्ये फेरीवाले आणि प्रस्तापित कंत्राटदारांची साखळी मोडून काढण्यासाठी जेम पोर्टवरुन निविदा निमंत्रित करण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांचा थयथयाट होत आहे. त्यामुळे माजी महापौर पद भूषवलेल्या विरोधी पक्षनेत्यांकडून मुंबईच्या विकासाच्या मुद्दयावर जर आरोप झाले असते तर बरे वाटले असते, परंतु या महापौरांना साडी,घड्याळ, वेणी, फणी आणि दिवाच दिसल असल्यामुळे हे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांनी शेलक्या शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल दिवा तथा लुकलुकणारे दिवे, तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या मुद्दयावर महापालिका सभागृहनेते गणेश खणकर तसेच महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेवून आरोपांचे खंडन केले. या पत्रकार परिषदेमध्ये रितू तावडे यांनी महापौरपदी विराममान झाल्यानंतर वाहन, कार्यालय तसेच कर्मचारी वर्ग प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मला वाहन देण्यात आले असून त्यावरील लुकलुकणारे दिवे हे मी मागणी केल्यानुसार नव्हेतर प्रशासनाने वाहनासोबतच जोडून दिले होते. त्यामुळे त्यामुळे आम्हाला कुठल्याही वाहनावरील दिव्याची हौस नसून आम्ही सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आहोत. याबाबतचे वृत्त आल्यांनतर मी स्वत:हून आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि ही चूक प्रशासनाने स्वत: मान्य केली असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच ज्यांनी याप्रकारे दिवा बसवण्याची चूक केली असेल तर संबधितांवर कारवाई करण्याची सूचनाही प्रशासनाला केल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सत्तेवर आल्यापासून नागरिक आपल्या समस्या घेवून महापालिकेत येत आहेत. पण याला विरोधी पक्षनेत्या महापालिकेत बाजार भरल्याचे म्हणत आहे. त्यांच्या २५ वर्षांत सामान्य माणसांना प्रवेश नव्हता, तर कंत्राटदारांना होता आणि आता भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांनाही आपली कामे होण्याचा विश्वास असल्यामुळे नागरिक येत आहेत. मी प्रत्येक नागरिकाला भेट असून आता त्यांची गर्दी नियंत्रण आणण्यासाठी म्हणून मी सुरक्षा व्यवस्था मागवली आहे. तो मला पिठासीन अधिकारी म्हणून अधिकार आहे. पण विरोधी पक्षनेत्यांना अधिक सुरक्षा कशाला हवी. त्यांनी का अशी मागणी केली असाही सवाल महापौरांनी केला.
त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यापासून बांग्लादेशी तसेच रोहिंग्ये मुस्लिमांना हटवणे तसेच फेरीवाल्यांना हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे.त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षांच्या लोकांना पोटशुळ उठला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जर रुग्णालय, शाळांसह इतर विविध समस्यांबाबत चर्चा केली असती तर मी त्यावर समोरासमोर जावून उत्तर द्यायला तयार आहे. पण त्यांची बौध्दीत क्षमता तेवढीच आहे. त्यांना फक्त घड्याळ, दिवा, वेणी, फणी आणि साडीच दिसणार असा सवाल केला.
महापौर आरोग्य निधी महापौरांनी अडवला अशाप्रकारचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात जे अर्ज प्राप्त झाले आहेत, ते साडेचार वर्षांतील आहेत. त्यातील किती रुग्ण दाखल आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या ३० लाख रुपयांचा निधी असला तरी प्रत्येक रुग्णाला निधी मंजूर करताना अर्जदार रुग्ण रुग्णालयात दाखल आहे का याची तपासणी करा, आणि त्यानंतरच अत्यावश्यक रुग्णांच्या आर्थिक मदतीचे अर्ज निकालात काढूया अशाप्रकारचे निर्देश संबंधित खात्याला दिले आहेत. महापौर निधी वाढवण्यासाठी आपला प्रयत्न सुरु असून हार फुले तसेच पुष्पगुच्छ यांच्यासाठी होणार खर्च या महापौर निधीत जमा होण्यासाठी क्यू आर कोडची सुविधाही देण्यात आली आहे.जेणेकरून महापौर निधी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
सभागृहनेते गणेश खणकर यांनी यापूर्वी महापौरांच्या वाहनांवर लाल दिवा बसवण्याबाबत यापूर्वीच्या महापौरांचे काय म्हणणे याचे दाखले दिले. आम्ही ज्याप्रकारे कामाची धडका लावला आहे, त्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे. त्यामुळे त्यांच्या मतपेटीला धक्का लागत असल्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारचे आरोप होत आहे. पण बांग्लादेशी आणि रोहिंग्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरुच राहिल. जे फेरीवाले आहे त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्ही कुणाच्या दबावात येत नसून कंत्राटदारांची साखळी तोडली जात असल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आडून तर हा प्रयत्न होत नाही ना असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे गणेश खणकर यांनी स्पष्ट केले. आमची बांधिलकी मुंबईकरांशी आहे आणि त्यानुसारच आम्ही मुंबईकरांना सेवा देण्यासाठी काम करत राहू. राहिला मुद्दा लाल दिवा हा प्रश्न प्रशासनाशी निगडीत आहे. तो प्रश्न त्यांनी सोडवावा,असे त्यांनी सांगितले.