आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.


मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शांताराम मोरे, सुलभा गायकवाड, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, मनीषा चौधरी, दिलीप लांडे, संजय उपाध्याय तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी मोठ्या व नामांकित खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.


मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांनाही मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाकडून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने या योजनेतील उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढवली आहे. तसेच उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पार पडत आहे. गुणवत्ता निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही दिली जात आहे.





गेल्या वर्षभरात घेतलेल्या विविध सुधारात्मक निर्णयांमुळे रुग्णसंख्या, उपचारांची संख्या आणि त्यावरील खर्चातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच योजनेचे जिल्हा समन्वयकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे, तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समित्यांच्या नियमित बैठका घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेत सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.


बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी योजनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. तर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील वाढ, दरातील बदल, ऑनलाईन प्रणाली आणि दाव्यांच्या वेळेवर अदायगी याबाबत सादरीकरण केले.


यावेळी उपस्थित आमदार तसेच मुंबई महानगर परिसरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही आपली मते मांडली.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य