- अफगाण या हल्ल्याचे उत्तर नक्कीच देईल : हमदुल्लाह फितरत
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी शुक्रवारी आरोप केला की पाकिस्तान हवाई दलाने कंधार विमानतळाजवळील खासगी विमान कंपनी काम एअरच्या इंधन डेपोवर हवाई हल्ला केला.
मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की ही कंपनी देशांतर्गत विमानसेवांसोबतच संयुक्त राष्ट्रांच्या विमानांनाही इंधन पुरवते. त्यांनी यापूर्वीही पाकिस्तानवर राष्ट्रीय व्यापारी हाजी खान जादाह यांच्या इंधन साठ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता.
माध्यमांच्या अहवालानुसार, पाकिस्तान सैन्याने अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील अलीशेर-तेरेजाई जिल्ह्यातील अनेक भागांनाही लक्ष्य केले. हा परिसर तथाकथित डूरंड रेषेजवळ आहे.अफगाण माध्यम न्यूजच्या वृत्तानुसार, तोफगोळाबारीत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही देशांमधील सीमाभागात गेल्या महिन्यापासून हवाई हल्ले आणि सैन्य चकमकींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अफगाणिस्तानचे प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी एक x पोस्ट करत पाकिस्तानच्या या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
अफगाण या हल्ल्याचे उत्तर नक्कीच देईल : हमदुल्लाह फितरत
मागील आक्रमण आणि गुन्ह्यांच्या मालिकेचा पुढचा भाग म्हणून पाकिस्तानच्या लष्करी शासनाने पुन्हा एकदा काबूल, कंदहार, पक्टिया, आणि इतर अनेक भागांवर बॉम्बहल्ले केले आहेत. काही ठिकाणी नागरिकांची घरे जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आली, ज्यामुळे महिला आणि मुलांचा मृत्यू झाला. तर इतर काही भागांमध्ये वाळवंटातील आणि निर्जन भागांवर हल्ले करण्यात आले. या कारवायांमुळे बेफिकीर लष्करी वर्तन आणि सामान्य नागरिकांच्या जीविताबद्दलचा स्पष्ट अनादर दिसून येतो.
पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत आणि ईदच्या पूर्वसंध्येला असा क्रूर हल्ला करण्यात आल्याने हे स्पष्ट होते की या कृत्यांसाठी जबाबदार असलेले लोक मानवीय मूल्ये, नैतिक जबाबदारी किंवा सार्वत्रिक नैतिक तत्त्वांबद्दल कोणतीही खरी बांधिलकी ठेवत नाहीत. इस्लामिक अमिरात या गुन्ह्याचा आणि या उघड आक्रमणाचा तीव्र निषेध करते आणि हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की अफगाण या हल्ल्याचे उत्तर नक्कीच देईल.
फेब्रुवारी २७ रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह अनेक शहरांवर हवाई हल्ले केले होते. त्या वेळी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याला उघड युद्ध असल्याचे म्हटले आणि पाकिस्तानचा संयम संपल्याचे सांगितले. त्यांनी तालिबानवर जागतिक दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की २६ फेब्रुवारी रोजी डूरंड रेषेजवळ झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत ५५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
विश्लेषकांच्या मते, २०२१ मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध सातत्याने तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तान दीर्घकाळापासून आरोप करत आहे की अफगाणिस्तानात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी ) ला सुरक्षित आश्रय मिळतो.
२००७ मध्ये स्थापन झालेली ही संघटना अफगाण तालिबानपासून वेगळी असली तरी विचारसरणी आणि नेटवर्कच्या पातळीवर दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते. अलीकडच्या काळात पाकिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि टीटीपीच्या हल्ल्यांत वाढ झाली असून विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांत प्रभावित झाले आहेत.