नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक बाजारपेठ धोक्यात आल्याचे दिसू लागले आहे. राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ऊर्जा टंचाईचे धक्के बसू लागल्याचे गुरुवारी चित्र दिसत होते. ही भीती ग्रामीण भागातही पसरू लागल्याने अनेक छोटी उपाहारगृहे, हॉटेल, धाबे यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण दिसू लागले आहे. गॅस सिलिंडरबाबत दररोज नवनवीन अफवा पसरत असल्याने देशामध्ये गॅस सिलिंडरच्या दररोजच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ झाली आहे.
मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतासह जगभरात ऊर्जा संकटाचा धोका निर्माण झाला आहे. भारतातही विविध राज्यांत गॅस सिलेंडर टंचाईच्या झळा बसण्यात सुरुवात झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन सद्य परिस्थितीची माहिती दिली. सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सर्व नागरिकांना आवाहन करते की, अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नका. दडपणामुळे गॅस सिलेंडर खरेदी करण्याची घाई करू नका. आमचे सरासरी बुकिंग दररोज सुमारे ५० ते ५५ लाख आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बारकाईने पाहिले तर ही बुकिंग संख्या सुमारे ७५-७६ लाखांपर्यंत वाढली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या कॉल सेंटर्समधील जागांची संख्या ४०० पर्यंत वाढवण्यात आली आहे. टेलिफोन लाइन्सची संख्या ५० पर्यंत वाढवण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिक तेथे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यांना सतत समन्वय आणि सहकार्य करण्याचे आश्वासन
इंधन पुरवठ्याबाबत राज्यांना सतत समन्वय आणि सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आणि अशा घटना घडू नयेत याची खात्री करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि भारत सरकारचे ग्राहक व्यवहार सचिव यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सर्व सचिवांसोबत बैठक घेतली आणि त्यांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.