मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले
गुवाहाटी येथील समारंभात "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.
या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी आसाममधील गुवाहाटी कोकराझार येथे पंतप्रधानांच्या हस्ते १९,४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली
महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी
राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹१,८३७ कोटींची रक्कम थेट जमा होणार असून या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटी) माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते. विधानभवन समिती कक्षातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव लेखा व कोषागारे रिचा बागला दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पारदर्शक आणि सक्षम व्यवस्था उभारली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जात असल्याने त्यांना शेतीच्या हंगामी कामांसाठी आधार मिळत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वेळेत वितरित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
"राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹१,८३७ कोटी थेट जमा होणार असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठी मदत मिळणार आहे”.