मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांबरोबर आणि विभागांसोबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे इत्यादींच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या कामांबाबत नियमित समन्वय साधत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच मेट्रो प्रशासनाने देखील त्यांच्या स्तरावर पाणी उपसा करणारे पंप बसवावेत. हे पंप बसवताना प्रत्येक मेट्रोस्थानकाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन व तेथील गरज लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या संख्येने व योग्यता क्षमतेचे पंप बसवावेत असेही निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी पार पडली. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे, महानगरपालिकेचे सह आयुक्त, विविध परिमंडळ आणि विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांचही या बैठकीला उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो आणि मोनो रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), मुंबई पोलीस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक (बेस्ट) इत्यादी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवताना व त्याबाबत सूचना देताना; संबंधित यंत्रणांना त्यांच्या स्तरावरील कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा, ही बाब लक्षात घेऊन पूर्व सूचना देणे गरजेचे असल्याचेही महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान नमूद केले. तसेच मुंबईतील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. तसेच, ज्या धोकादायक इमारतींबाबत तेथील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा प्रकरणी सुनिश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार अर्थात 'एसओपी' नुसार कार्यवाही करावी. घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचा संदर्भ नमूद करत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सर्व यंत्रणांना त्यांच्या जागेतील होर्डिंग बाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या होर्डिंग धोरणानुसार होर्डिंग असल्याची सुयोग्य खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचसोबत होर्डिंग ज्या ढाच्यावर उभे करण्यात आले आहे, त्या ढाच्याची देखील तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे सह सर्व संबंधित यंत्रणांना दिले.