मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून कामकाजाला सुरुवात केली आहे. महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत महत्त्वाच्या सात उपक्रमांची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या पहिल्या नागरिक म्हणून कार्यरत असलेल्या महापौर रितू तावडे यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गतिमान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुंबईच्या विकासासाठी तयार केलेल्या १०० दिवसांच्या आराखड्यातील सर्व २१ मुद्दे निश्चितपणे पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्रित प्रशासन देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात मुंबईच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापौरांच्या या उपक्रमांमुळे मुंबईत दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुशासन, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
महापौरांच्या १०० दिवसांच्या प्राधान्यक्रम आराखड्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे
_सुरु असलेल्या सर्व रस्त्यांचे युटिलिटी कॉरिडॉर सहित सिमेंट काँक्रिटमध्ये रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करणे.
-भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व सामग्रीची खरेदी जेम पोर्टलवरून करणे.
_ मुंबईला अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी समुदाय स्तरावर स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करून सदर स्पर्धेचे परीक्षण व मूल्यांकन करण्याकरिता स्वतंत्र संस्थेची नेमणूक करणे. कचरामुक्त वॉर्ड निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे. तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये असलेल्या डम्पिंगच्या जागा वॉर्डनिहाय तपासणी करून त्यांना बाद करणे व दत्तक वस्तीची यंत्रणा वाढविणे.
पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई पूर्ण करणे तसेच मुंबईत पावसाळ्यात जोरदार पावसावेळी तुंबणाऱ्या पाण्यापासून मुक्तता देण्यासाठी ब्रिमस्टोवॅड २
प्रकल्पाची अंमलबजावणी करणे तसेच आय. आय. टी. मुंबई अभ्यासगटाची नेमणूक करणे.
-पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती करण्यास्तव शहरी फेरीवाला समिती गठीत करून घेणे. त्यानंतर सर्व पात्र फेरीवाल्यांना शहरी फेरीवाला समितीने ठरविलेल्या हॉकिंग झोनमध्ये स्थलांतरित करून पुनर्वसन करणे व सर्व पात्र फेरीवाल्यांना क्यू. आर. कोड सहित लायसन्स कम आयकार्ड वितरीत करणे.
- महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सुविधा उच्चस्तरीय करण्यासाठी नियोजन करणे.
-महानगरपालिकेच्या सर्व शाळांची पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय शाळांच्या दर्जाची करणे तसेच शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी उपाययोजना करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरू करणे.
-गारगाई-पिंजाळ जलप्रकल्पाच्या प्रगतीची तपासणी करणे.
-महानगरपालिकेच्या सर्व खुल्या जागांचे धोरण निश्चित करणे तसेच महानगरपालिकेच्या सर्व मोकळ्या जागांचे महानगरपालिकेतर्फेच परीक्षण करणे.
- सर्व पदपथ स्टॅम्प्ड काँक्रिटमध्ये करण्याचे नियोजन करणे.
- महानगरपालिकेचे भूमिगत तसेच अधिभूमी वाहनतळे निर्माण करण्याकरिता जागा निश्चित करणे तसेच अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक वाहनतळाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याकरिता धोरण ठरविणे.
-सुरक्षित मुंबईच्या दृष्टीकोनातून प्रकाशमानता (लक्स लेव्हल) कमी असलेल्या रस्त्यांवर दिवाबत्ती वाढविणे.
-मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे.
- वय वर्षे १४ वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग लसीकरण मोहिमेसाठी उपाययोजना व धोरण ठरविणे.
- मुंबई व नवी मुंबई यामध्ये प्रवेशद्वाराची निर्मिती करणे.
- सर्व खासगी ले-आऊटमधील रस्ते व मोकळ्या जागांकरिता महानगरपालिकेच्या निधीचा वापर करण्यासाठी धोरण ठरविणे.
- बेस्ट उपक्रम शाश्वत करण्यासाठी उपाययोजना करणे.
- मेयर जेन नेक्स्ट इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करणे.
-लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यासाठी उपाययोजना करणे.
- मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स तयार करण्यासाठी जागेची निवड करणे.
-मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देण्याबाबत गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंह मिळावेत, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्याकडे लेखी विनंती केली आहे. लवकरच सिंह, सिंहीण जोडी मिळावी, यासाठी महापौर स्वतः पाठपुरावा करीत आहेत.