नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत मध्य पूर्वेतील तणावाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी उदयोन्मुख घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित मंत्रालये प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधत आहेत."
परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आमच्या सरकारने २० फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून खोल चिंता व्यक्त केली होती. सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. आमचा अजूनही असा विश्वास आहे की तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा वापर केला पाहिजे."
'हा संघर्ष भारतासाठी चिंतेचा विषय'
एस जयशंकर म्हणाले, "हा संघर्ष भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आपण शेजारील प्रदेश आहोत आणि पश्चिम आशियातील स्थिरता आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. १ कोटी भारतीय आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. इराणमध्ये अभ्यास किंवा रोजगारासाठी काही हजार भारतीय देखील आहेत. हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार समाविष्ट आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि अस्थिरतेचे वातावरण हे गंभीर मुद्दे आहेत."
"The Prime Minister continues to closely monitor the emerging developments, and relevant ministries are coordinating to ensure effective responses," says EAM Dr S Jaishankar as he makes a statement in the Rajya Sabha on the situation in West Asia. https://t.co/AXC9nujGpk pic.twitter.com/dDLt9S92QH
— ANI (@ANI) March 9, 2026
जयशंकर म्हणाले, "संघर्ष सतत वाढत आहे आणि या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती बिघडली आहे. हा संघर्ष इतर देशांमध्ये पसरला आहे आणि विध्वंस वाढत आहे. सामान्य जीवनावर स्पष्टपणे परिणाम होत आहे."
'दोन भारतीयांचा मृत्यू, एक बेपत्ता'
आम्ही व्यापारी जहाजावरील दोन भारतीय खलाशी गमावले आहेत आणि एक अजूनही बेपत्ता आहे, असे जयशंकर यांनी सांगितले आहे.
तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल काय सांगितले?
जयशंकर यांनी सांगितले की, तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत केली आहे. विद्यार्थ्यांना देशाबाहेर हलवण्यात दूतावासाने सक्रिय सहकार्य केले. त्यांनी पुढे सांगितले की, इराणमधील भारतीय नागरिकांना आर्मेनियामार्गे भारतात परत आणण्यासाठी आणि बाहेर काढण्यात मदत करण्यात आली. दूतावास पूर्णपणे सक्रिय आणि उच्च सतर्क आहे. आम्ही भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी पूर्ण वचनबद्धतेने काम करत आहोत.







