Saturday, March 7, 2026

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर

आजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण, करिअर, समाज आणि राष्ट्र घडवणारी एक सक्षम शक्ती आहे. महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नाही, तर स्त्रियांच्या हक्कांची, क्षमतांची आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे.

आजच्या मुलींनी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. “मी करू शकते” ही भावना मनात रुजवली, तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. शिक्षण हे स्त्रीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे संधी मिळेल तेवढे शिकणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ताण-तणाव असताना मोकळेपणाने बोलणे, मदत मागणे ही कमजोरी नसून शहाणपणाचे लक्षण आहे.

आजच्या काळात स्वसंरक्षणाचे ज्ञान आणि कायदेशीर हक्कांची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या हक्कांसाठी उभे राहणे, चुकीला ‘नाही’ म्हणणे आणि स्वतःचा सन्मान जपणे हे प्रत्येक स्त्रीने शिकले पाहिजे. स्त्री ही मुळातच बहुगुणी असते - ती संवेदनशील आहे, कणखर आहे, आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे. एक सक्षम स्त्री फक्त स्वतःचेच नाही, तर संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल करते.

या महिला दिनी प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने एवढे नक्की ठरवावे -“मी माझी स्वप्ने घाबरून सोडणार नाही, मी स्वतःसाठी उभी राहीन आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवीन.” समाजात अनेकदा “महिला अधिक सामर्थ्यवान की पुरुष?” असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न फक्त शारीरिक ताकदीपुरता मर्यादित न ठेवता, मानसिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक सामर्थ्याच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते. कारण सामर्थ्य हे एकांगी नसून बहुआयामी असते.

शारीरिक सामर्थ्य

सामान्यतः पुरुषांचे शरीर अधिक स्नायूयुक्त असल्याने शारीरिक ताकद जास्त असते, असे मानले जाते. जड कामे, युद्ध, कष्टाची शारीरिक मेहनत यामध्ये पुरुष आघाडीवर दिसतात. मात्र आजच्या काळात अनेक महिला खेळ, सैन्य, पोलीस दल, साहसी क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे शारीरिक सामर्थ्य हा एकमेव निकष ठरू शकत नाही.

मानसिक व भावनिक सामर्थ्य

मानसिक व भावनिक सामर्थ्याच्या बाबतीत महिला खूप पुढे आहेत. वेदना सहन करण्याची क्षमता, कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळणे, ताण-तणावातही संयम राखणे हे महिलांचे मोठे सामर्थ्य आहे. आई म्हणून प्रसूतीसारखा अत्यंत कठीण अनुभव सहन करणे हे महिलांच्या अद्वितीय शक्तीचे उदाहरण आहे. पुरुषही मानसिकदृष्ट्या खंबीर असतात, पण भावना व्यक्त करण्यात ते अनेकदा मागे राहतात.

बौद्धिक सामर्थ्य

बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, सर्जनशीलता या बाबतीत महिला व पुरुष समान आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योग, कला अशा सर्व क्षेत्रांत महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आज महिला डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी म्हणून देशाचे नेतृत्व करत आहेत. यावरून बौद्धिक सामर्थ्यात कोणताही लिंगभेद नाही हे स्पष्ट होते.

सामाजिक सामर्थ्य

पूर्वी महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते; मात्र आज समाजात महिलांचे स्थान झपाट्याने बदलत आहे. स्वावलंबन, आत्मविश्वास, हक्कांची जाणीव आणि नेतृत्वगुण यामुळे महिला अधिक सक्षम होत आहेत. पुरुषांचेही सामाजिक सामर्थ्य मोठे आहे, परंतु स्त्री-पुरुष परस्परपूरक असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. “महिला की पुरुष कोण सामर्थ्यवान?” या प्रश्नाचे उत्तर कोण अधिक, कोण कमी असे नसून दोघेही वेगवेगळ्या प्रकारे सामर्थ्यवान आहेत, असे आहे. पुरुषांचे सामर्थ्य जिथे शारीरिक व बाह्य स्वरूपाचे असते, तिथे महिलांचे सामर्थ्य मानसिक, भावनिक व सहनशीलतेत दिसते. समाजाचा समतोल राखण्यासाठी दोघांचेही सामर्थ्य तितकेच आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष हे प्रतिस्पर्धी नसून सहकारी आहेत. समतेच्या आणि परस्पर सन्मानाच्या नात्यातच खरे सामर्थ्य दडलेले आहे.

सामर्थ्यवान कोण?

नदीच्या काठी एक ओंडका होता. त्याच्या आजूबाजूला खडक (पाषाण) होते. ओंडक्याच्या जवळच्या खडकातून एक नवीन रोपटे उगवले.नदीच्या पाण्यामुळे ते भराभर वाढू लागले. त्याला हिरवी पाने आली. ती एक नाजूक वेल होती. वेल हळूहळू बोलायला शिकली नि मग ओंडक्याच्या अन् तिच्या गप्पा रंगू लागल्या. वेलीला जगाबद्दल अनुभव सांगताना ओंडका म्हणाला, “इथे पुरुषांचे वर्चस्व आहे, येथील पुरुष पराक्रमी आहेत. तर स्त्री मात्र अतिशय दुबळी आहे, तिला जगण्यासाठी पुरुषांचा आधार घ्यावा लागतो. आता तूच पाहा ना, तुला वाढायचे असेल तर माझा आधार घ्यावा लागेल.” पण वेलही अतिशय हुशार नि चौकस होती. ती म्हणाली, “जगण्यासाठी सर्वांना एकमेकांच्या आधाराची गरज असते. जसे पाण्यासाठी सर्वांना नदीचा आधार घ्यावा लागतो, पिलांना आपल्या माता-पित्यांचा आधार घ्यावा लागतो, तसाच मी पण वाढीसाठी तुझा आधार घेतला आहे, तूही जमिनीवर उभा आहेस म्हणजेच एका स्त्रीचा आधार घेतला आहेस.” मात्र कितीही समजावले तरी स्त्री ही दुबळी, पुरुष सामर्थ्यवान या मताशी ओंडका ठाम होता.

वेल मात्र भराभर वाढत होती. आता ओंडक्याच्या अंगावर जागा उरली नाही असे पाहून ती खडकाच्या अंगावर त्याचा आधार घेण्यासाठी चढली. ओंडका तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसायचा. मात्र त्या हसण्याकडे वेल दुर्लक्ष करायची. या ओंडक्याचे स्त्री-पुरुष भेदभावाचे विचार पुसून टाकण्याचा विचार वेलीने केला. एके दिवशी निसर्गाने वेलीला ही संधी दिली. अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला. अनेक प्राणी, दगड पाण्याबरोबर वाहू लागले. ओंडक्याकडेही पाण्याने मोर्चा वळविला. खरे तर पाण्याने ओंडका वाहून जायचा पण वेलीने त्याला घट्ट बांधून ठेवले असल्याने तो तसाच उभा राहिला. एका वेलीने, एका स्त्रीने त्याचे प्राण वाचविले. पुढे नदीचे पाणी ओसरल्यावर ओंडक्याने वेलीची क्षमा मागितली.

तात्पर्य : यशस्वी होण्यासाठी जीवनात स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो. विचार : जेव्हा अहंकार नष्ट होतो, तेव्हा आत्मा जागृत होतो.

Comments
Add Comment