तेहरान: गेल्या आठवड्याभरापासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया धुमसत आहे. या भागातील देशांमध्ये खजिन तेल, नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक देशांना इथूनच इंधन पुरवठा होतो. पण युद्धामुळे इंधन पुरवठा संकटात सापडला आहे. युद्धामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. सुदैवानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चीन पाठोपाठ भारतीय जहाजांनी ये-जा सुरु केली आहे. ट्रॅकिंग डेटामधून ही माहिती समोर आली आहे.
भारताची दोन कार्गो जहाजं पुष्पक आणि परिमल होर्मुझ सामुद्रधुनीतून पूर्ण वेगानं मार्गक्रमण करत आहेत. याआधी इराणनं केवळ चीनच्या जहाजांनाच हा मार्ग वापरण्याची परवानगी दिली होती. पण आता भारतीय जहाजांसाठीही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भारत आणि इराणमध्ये 'समझोता' झाल्याची चर्चा आहे.
भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा फोनवरुन संवाद झाल्यानंतर होर्मुजमधून भारतीय जहाजं प्रवास करत असल्याची बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. सोबतच इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. जयशंकर यांच्या सोबतही चर्चा केली आहे.
होर्मुजमधून भारताची मालवाहू जहाजं ये-जा करु लागली आहे. दुसरीकडे इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशरी गार्ड कॉर्प्सनं (आयआरजीसी) अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. होर्मुझमधील वाहतूक सुरुच ठेवू. जहाजांना संरक्षण देऊ, अशी भूमिका घेत अमेरिकेनं इराणला डिवचलं होतं. त्यावरुन इराणनं अमेरिकेला थेट आव्हान दिलं आहे. अमेरिका व्यापारी जहाजांना संरक्षण देईल, याची आम्ही वाट पाहात आहोत, असं आयआरजीसीनं म्हटलं आहे.
एकीकडे इराण अमेरिकेला थेट आव्हान देत असताना दुसरीकडे पुष्पक आणि परिमल होर्मुझमधून प्रवास करत आहेत. सध्याच्या घडीला हा व्यापारी मार्ग जणू मृत्यूचा मार्ग बनला आहे. पण भारतीय व्यापारी जहाजांनी होर्मुझचा वापर बिनदिक्कतपणे सुरु केल्यानं इराणसोबत भारताचा गुप्त करार झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर हल्ले केले जाणार नाहीत, असं आश्वासन इराणनं भारताला दिलं असण्याची शक्यता आहे.







