नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावादरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या व्यापारी मार्गात अडथळे आणल्याने जगभरात होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतामध्येही दिसू लागला आहे. अदानी टोटल गॅसने औद्योगिक गॅसची किंमत तब्बल तिप्पटीने वाढवून थेट ४० रुपयांवरून ११९ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरवर नेली आहे. त्यामुळे हे टंचाईचे संकट अधिक काळ सुरू राहिल्यास उद्योग, शेती, वीज व दररोजच्या वापरातील अनेक गोष्टी कमालीच्या महाग होऊ शकतात.
२८ फेब्रुवारीला अमेरिका व इस्राइलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्ग हा जहाजांसाठी धोकादायक असल्याची घोषणा केली होती. जगभरातील इंधनाच्या पुरवठ्यापैकी बहुतांश पुरवठा हा याच मार्गाने होत असल्याने जागतिक इंधनाच्या बाजारात खळबळ उडाली. तसेच येथून होणाऱ्या वाहतुकीमध्ये घट झाली. त्यामुळे अनेक टँकर समुद्रातच उभे राहिल्याने जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला.
२ मार्च रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कतारला आपल्याकडील एलएनजीचे उत्पादन थांबवावे लागले. हे जगातील सर्वात मोठे एलएनजी निर्यात केंद्र असल्याचे मानले जाते. तसेच भारत कतारमधूनच दरवर्षी २.७ कोटी टन एवढा एलएनजी आयात करतो. जे भारताच्या एलएनजीच्या आयातीच्या ४० टक्के एवढे प्रमाण आहे. त्यामुळे कतारच्या या निर्णयामुळे येत्या काळात भारतात एलएनजीच्या किमती आणखी भडकू शकतात. भारतात एलएनजीचा सर्वाधिक वापर हा उद्योगांमध्ये होत असल्याने याचा परिणाम देशातील एकूण महागाईवर होऊ शकतो तसेच दैनंदिन वापरातील अनेक वस्तू महाग होऊ शकतात.







