Saturday, March 7, 2026

इंधनाचा मुबलक साठा, तरीही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा!

इंधनाचा मुबलक साठा, तरीही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवांमुळे काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. तज्ज्ञांच्या मते, अशा अफवांमुळे कृत्रिम टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

एचपीसीएल आणि बीपीसीएल या दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा साठा मुबलक आहे आणि पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यपूर्वेतील तणाव किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार याबाबतच्या बातम्या अनेकदा चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. तेल कंपन्यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. बीपीसीएलने आपल्या निवेदनात म्हटले की, सर्व ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. नागरिकांनी फक्त अधिकृत स्रोतांवरून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.

भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत

भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत असल्याचा विश्वास सरकार आणि तेल कंपन्यांनी व्यक्त केला आहे. देशभरात पेट्रोलियम उत्पादनांचा आवश्यक साठा राखून ठेवला जात असल्याचे एचपीसीएलने सांगितले. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर काही तात्पुरती अडचण निर्माण झाली तरी, भारताकडे अनेक दिवस किंवा आठवड्यांसाठी पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे.

Comments
Add Comment