मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळले. भारतीय हवाई दलाने सांगितले की, सुखोई लढाऊ विमानाचा शोध सुरू आहे. या लढाऊ विमानाच्या वैमानिकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. विमानात दोन वैमानिक होते. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.
भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, Su-30MKI हे लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. जोरहाटपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग परिसरात हे लढाऊ विमान कोसळले. गुरुवारी संध्याकाळी जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातून उड्डाण करत असताना भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क तुटला. प्रत्यक्षदर्शींनी कार्बी आंगलोंग टेकड्यांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे सांगितले.
मध्यरात्री सुखोई-३० विमान कोसळल्याची पुष्टी
संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की भारतीय हवाई दलाचे सुखोई-३०एमकेआय विमान बेपत्ता आहे. विमानाने आसाममधील जोरहाट विमानतळावरून उड्डाण केले आणि संध्याकाळी ७:४२ वाजता रडारशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पहाटे १ वाजताच्या सुमारास अपघाताची पुष्टी केली.
बेपत्ता झाल्यानंतर तीव्र शोध मोहीम
रशियन बनावटीचे लढाऊ विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. नंतर असे आढळून आले की, सुखोई-३० उड्डाणानंतर लगेचच कोसळले. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजान उपविभागातील चोकीहोला परिसरातील काही स्थानिक रहिवाशांनी विमान जंगलात कोसळल्याचा दावा केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला अपघाताचे काही फोटो देखील दाखवले.
सुखोई-३० हे कोणत्या प्रकारचे लढाऊ विमान आहे?
सुखोई ३० एमकेआय हे दोन आसनी असलेले, लांब पल्ल्याचे लढाऊ विमान आहे. ते रशियन विमान उत्पादक सुखोईने विकसित केले आहे. आता ते एचएएलच्या परवान्याअंतर्गत भारतात तयार केले जाते. भारतीय हवाई दलाकडे अशी २६० हून अधिक विमाने आहेत. सुखोई-३० लढाऊ विमान यापूर्वीही कोसळले आहे.
यापूर्वी जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक सुखोई लढाऊ विमान कोसळले होते. जानेवारी २०२३ मध्येही सुखोई-३० विमानाचा अपघात झाला होता. २०२३ मध्ये ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर आणखी एक सुखोई-३० विमान कोसळले.







