मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे बांधकाम जुने झाले असून या जलााशयातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. तसेच मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा करता येत नाही. त्यामुळे या जुन्या जलाशयाची तातडीन दुरुस्ती करण्याची आता गरज भासली आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/मध्य विभागात बोरीवली टेकडी जलाशय क्र.२ व ३ मधून बोरीवली व दहिसर परिसरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. बोरीवली टेकडी जलाशय क्र. २ हा जलाशय सन १९९२ मध्ये बांधलेला आहे. त्याची पाण्याची साठवण क्षमता ३६.२ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. तर बोरीवली टेकडी जलाशय क्र. ३. सन १९९६ मध्ये बांधलेला असून त्याची पाण्याची साठवण क्षमता ३६.४ दशलक्ष लिटर्स आहे. या दोन्ही जलाशय सुमारे ३० वर्षापेक्षा जुने असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागारांमार्फत या जलाशयांचे संरचनात्मक लेखापरिक्षण घेण्यात आले.
या स्ट्र्क्चरल ऑडीटनुसार दोन्ही जलाशयांना तातडीने व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे या दोन्ही जलाशयांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज भासली आहे. महापालिका जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जलाशयांची पाणी साठवण करण्याची क्षमता जेवढी आहे, तेवढी करता येत नाही. त्यामुळे येथील परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही जलाशयांची तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे
या जलाशयाच्या दुरुस्ती कामांमुळे जलाशयाच्या विद्यमान छतावरील असलेले जलप्रतिबंधक आवरण काढण्यात येईल. सिमेंट काँक्रिटच्या भागाचे लोखंडी सळयापर्यंतचे आवरण काढून लोखंडी सळ्यांची गंज काढणे आणि त्यावर गंज प्रतिबंधक उपाययोजना करणे. त्यावर व्हॉल्व बसवणे आदी प्रकारणी कामे केली जाणार आहे. या दोन्ही जलाशयांच्या दुुरुस्ती कामांसाठी सुमारे ३७ कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. जलाशयाच्या दुरुस्ती कामांसाठी एपीआय सिव्हिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.