मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतिक्षित ‘रो-रो’ सेवेचा विस्तार आता अधिक व्यापक होणार आहे. या मार्गावर आता रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे तीन नवे थांबे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी महामंडळाने (एमएमबी) घेतला आहे. या तिन्ही ठिकाणच्या जेट्टींची कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील जलवाहतुकीचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या सेवेला कोकणवासियांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, मार्गावरील अन्य प्रमुख बंदरांना जोडण्याची मागणी जोर धरत होती. दिघी (रायगड) हा दक्षिण रायगडला जलमार्गाने जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. औद्योगिक आणि बंदर विकासाच्या दृष्टीने जयगड (रत्नागिरी) हा थांबा महत्त्वाचा ठरेल. वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथील थांब्यामुळे मालवण, तारकर्ली, शिरोडा या पर्यटनस्थळांना भेट देणे सुलभ होणार आहे. तसेच, वाहनांसह प्रवासाची सोय असल्याने चाकरमन्यांच्या वेळेत आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल.
नेरुळ-मुंबई जलवाहतूकही लवकरच
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेच्या विस्तारासोबतच, महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत नेरुळ ते मुंबई ही जलवाहतूक सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.
हर्णे बंदरात थांबा मिळावा - गृह राज्यमंत्री योगेश कदम
- रोरो सेवेचा लाभ दापोलीवासियांना व्हावा यासाठी हर्णे बंदरात थांबा देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. ही सेवा मुंबई ते कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरणार असून, यामुळे सागरी दळणवळण सुकर होणार असल्याचे मंत्री कदम म्हणाले.
- दापोली तालुक्यात प्रवासासाठी रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे हर्णे बंदरात रो-रो सेवेचा थांबा दिल्यास सागरी दळणवळणास अधिक चालना मिळेल. हर्णे बंदरात सद्यस्थितीत जेट्टीचे बांधकाम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.