रावळपिंडी : ऑपरेशन सिंदूरमध्ये (२०२५) भारताने आणि आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानने (२०२६) पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर हल्ला केला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पाकिस्तानला दणका दिला आहे. रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा (बलुचिस्तान) येथील १२ व्या डिव्हिजनचे मुख्यालय, खैबर पख्तूनख्वा येथील मोहमंद एजन्सीमधील ख्वाजई कॅम्प आणि इतर अनेक महत्त्वाच्या पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना आणि कमांड सेंटरना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने जाहीर केले.
पाकिस्तानने काबूल आणि बगरामला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली. जर पुन्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हल्ले केले अथवा अफगाणिस्तानच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले तर अफगाणिस्तानकडून आतापर्यंत दिले त्यापेक्षा तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात फेब्रुवारी २०२६ पासून नव्याने संघर्षाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात पाकिस्तानचे शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी कारवाईत ४१५ अफगाण तालिबानी लढवय्ये मारले गेले आणि ५८० हून अधिक जखमी झाले असे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले. किमान १८२ अफगाण चौक्या नष्ट केल्या आणि ३१ चौक्या ताब्यात घेतल्या तसेच १८५ टँक, चिलखती वाहने आणि तोफखाना नष्ट केला, अफगाणिस्तानातील ४६ ठिकाणांवर प्रभावी हवाई हल्ले केले; असेही पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले.