पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील टाकवहाल परिसरातील बंद पडलेल्या दगड खाणीत ही दुर्घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं ?
मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाणी किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने दोन्हीही मुलांचा बुडून मृत्युज आला आहे. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला आहे. तर आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. यांचे कुटुंब हे मूळचे इंदोरचे असून रोजगारासाठी पालघरमध्ये मनोर परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.
पोलिसांची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंद खाणींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद पडलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे धोका वाढत असल्याची चर्चा आहे. अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि इशारे फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.